मुंबई - अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तणुकीचे आरोप केल्यानंतर बॉलिवूडमधील एकापाठोपाठ एक वाद आता समोर येत आहेत. "हॅश टॅग मी टू' या मोहिमेद्वारे महिलांनी आपल्यासोबत घडलेल्या घटनांविरोधात आवाज उठवण्यास सुरवात केली आहे. दिग्दर्शक विकास बहल, गायक कैलाश खेर आणि लेखक चेतन भगत यांच्याविरोधात महिलांना आवाज उठवला आहे.
"क्वीन' चित्रपटाचे दिग्दर्शक विकास बहल यांच्यावर एका तरुणीने छेडछाडीचा आरोप केला आहे. 2015मध्ये प्रदर्शित झालेल्या "बॉम्बे व्हेलवेट' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान विकासने गैरवर्तणूक केली असल्याचे या तरुणीने सांगितले आहे. आता या तरुणीला अभिनेत्री कंगना राणावतने पाठिंबा दिला. हे प्रकरण इथवरच थांबले नाही तर कंगनानेही विकासवर आरोप केले. "या तरुणीने विकासवर केलेल्या आरोपांमध्ये तथ्य आहे. कारण 2014मध्ये जेव्हा मी "क्वीन' चित्रपटाचे चित्रिकरण करत होते तेव्हा विकासचा विवाह झाला होता. पत्नीबरोबरील शारीरिक संबंधाबाबत तो मला सांगायचा. त्याने मला विचित्र पद्धतीने स्पर्श करण्याचाही प्रयत्न केला आहे. त्याचे वागणे काहीतरी चुकीचे आहे हे मला तेव्हाच जाणवले होते,' असे कंगनाने म्हटले आहे. कंगनाने विकासवर केलेल्या या आरोपामुळे एक नवा वाद समोर आला आहे.
तर दुसरीकडे गायक कैलाश खेर यांच्यावर एका महिला पत्रकाराने आरोप केले आहेत. ट्विटरवरून या महिला पत्रकाराने तिच्याबरोबर घडलेल्या या प्रकाराबाबत सांगितले आहे. "कैलाशच्या घरी मी आणि माझी जोडीदार मुलाखतीसाठी गेलो होतो. मुलाखत देताना कैलाश खेर सतत आम्हाला हात लावण्याचा प्रयत्न करत होता. आम्ही लगेचच मुलाखत संपवून तिथून काढता पाय घेतला,' असे या महिला पत्रकाराने तिच्या या पोस्टमध्ये लिहिले आहे.
|