मुंबई - आरोग्य विभागात तब्बल 15 हजार पदे रिक्त आहेत. मागणीएवढा औषधांचा पुरवठा होत नाही. डॉक्टरांच्या कमतरतेमुळे "आशा' कार्यकर्त्याच प्रसूती करत आहेत. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी राज्याला पूर्णवेळ आरोग्यमंत्री द्या, अशी मागणी वेगवेगळ्या संघटनांनी बुधवारी (ता. 23) आझाद मैदानात धरणे आंदोलनादरम्यान केली. या आंदोलनात राज्याच्या वेगवेगळ्या भागांतून आठ हजारहून अधिक कर्मचारी सहभागी झाले होते.
आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेता सरकारने वेगवेगळ्या योजनांचा वर्षाव सुरू केला असला तरी आरोग्य विभागाकडे दुर्लक्ष केले जात आहे. आरोग्य विभागाचा अतिरिक्त कारभार सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिला आहे. आरोग्य विभागातील समस्यांचा डोंगर पाहता हा अतिरिक्त भार शिंदे यांना कसा पेलता येईल, असा प्रश्न जनआरोग्य अभियानाच्या शकुंतला यांनी विचारला. सरकारी दवाखान्यांची स्थिती विदारक आहे. सरकारी योजनेच्या नावाखाली "आशा' कार्यकर्त्यांकडून वाटेल ती कामे करून घेतली जात आहेत. ही कामे नाकारणाऱ्या "आशां'वर गुन्हे दाखल झाले आहेत. औषधे नसल्याने चार दिवसांपूर्वी प्रसूत झालेल्या महिलेने लातूरमध्ये आत्महत्या केली, असे या वेळी नेत्यांनी सांगितले.
आरोग्य विभाग अनेक समस्यांनी ग्रस्त झाला आहे. या प्रश्नावर मोठे जनआंदोलन उभे राहण्याची गरज आहे.
- विश्वास उटगी, कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे नेते
|