लंडनहून भारतात परतेल्या मुलीची हृदयद्रावक कहाणी; आठ दिवसांनंतरही रिपोर्ट नाही, विमानसेवा आणि हॉटेलच्या नावाखाली उकळले लाखो रुपये

लंडनहून भारतात परतेल्या मुलीची हृदयद्रावक कहाणी; आठ दिवसांनंतरही रिपोर्ट नाही, विमानसेवा आणि हॉटेलच्या नावाखाली उकळले लाखो रुपये

 
विरार : प्रदेशात शिक्षणासाठी गेलेल्या विधार्थ्यांचे हाल आपण बातम्यातून बघत आलो होतो. परंतु परदेशातून भारतात परतल्यावरही त्यांचे हाल कमी होण्याचे नाव घेईना वसईतील बंगली येथील कुमारी संजना मिस्कीटा या अठरा वर्षांच्या विद्यार्थीनीला शिक्षणासाठी लंडन येथे असताना व भारतात परतल्यावर क्वारंटाईनमध्ये ठेवल्यावर अतोनात मानसिक व भावनिक आघात सहन करावे लागले आहेत. भारतात येऊन आठवडा झाला तरी तिला कोरोना बाबतचा रिपोर्ट मात्र मिळाला नाही. 

  नोव्हेंबर २०१९ मध्ये लंडनला शिक्षणासाठी गेलेल्या संजनाचा लंडन व मुंबई येथील लॉकडाऊनमधील अनुभव अक्षरश: वैफल्य व नैराश्य आणणारा होता. साधारणत: मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये लंडनमध्ये लॉकडाऊन घोषित झाले. देशोदेशींच्या विद्यार्थ्यांची (भारत सोडून) आपापल्या सरकारने सुटका करण्याची तजवीज केली. हळूहळू पूर्ण कॅम्पस/हॉस्टेलस् रिकामी होऊ लागली. नाही म्हणायला तिला जॉर्डन  देशातील सहकारी विद्यार्थीनीचाच तेवढा आधार होता. पण नंतर ती देखील आपल्या मायदेशी परतली व संजना मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचली.अठरा मार्चपासून इंग्लंडच्या विमानतळावरुन भारतात येणार्‍या विमानांवर बंदी घातली गेली व फक्त वीस तास आधी ही घोषणा करण्यात आली. त्याप्रमाणे तिने अठरा मार्च रोजीचे मुंबईसाठीचे तिकीट काढले व हिथ्रो विमानतळ गाठला. पण तेथून तिला निराशेनेच परतावे लागले. कारण भारत सरकारकडून विमानप्रवासाकरिता नकार आला होता. ती व तिच्यासारखे असंख्य भारतीय एकाच आशेवर जगत होते की भारत सरकार आपल्यासाठी काहीतरी मार्ग काढील व आपण सुखरूप मायदेशी परतू. दिवसांचे महिने झाले व अखेर ४ मे रोजी भारत सरकारने जाहीर केले की परदेशात अडकलेल्यांना मायदेशी परत आणणार. 

यातही तिला  एअर इंडियाने धक्कादायक माहिती दिली की लंडन ते मुंबईचे इकॉनॉमी क्लासचे तिकीट तब्बल ५६० पौंडस्! बरेचसे भारतीय मायदेशी परतण्यासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार होते. पण या सर्वांवर कडी म्हणजे एअर इंडियाने संजनाला फोन करून सांगितले की फक्त ‘बिझनेस क्लास’चे दीड लाख रूपयांचे तिकीट उपलब्ध आहे. हे ऐकून ती अक्षरश: गर्भगळीत झाली. पण तिचा नाईलाज होता व ते दीड लाखांचे तिकीट तिला घ्यावे लागले. लंडनमधील भारतीय दूतावासाकडे कोणताही ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ नव्हता व अल्पवयीन विद्यार्थ्यांना त्यांच्या लेखी अजिबात प्राधान्य नव्हते.
मुंबई विमानतळावर उतरल्यावर तर वेगळेच चित्र पहावयास मिळाले.

विमानतळावरील कर्मचारी विनामास्क, विनाग्लोव्हज् काम करीत होते. तेथे तिला क्वारंटीनसाठी मुंबई महापालिकेतर्फे हॉटेल्सची यादी देण्यात आली. तेव्हा समजले की फक्त महागड्या हॉटेल्सचीच नावे त्यात आहेत. त्यातही सुमार दर्जाच्या हॉटेल्सनी तारांकित हॉटेल्सचे दर लावले होते. हॉटेल टी-२४ रेसिडेंसीसारख्या सुमार हॉटेलसाठी १४ दिवसांचे रु. ६६,०००/- भरावे लागले. महापालिकेतर्फे सुमार दर्जाचे जेवण दिले जात होते व त्यासाठी महागडे दर आकारले जात होते.त्याशिवाय कोव्हिड चाचणीसाठी साडेचार हजार रूपये भरावे लागले व कहर म्हणजे साध्या कागदावर बिना नाव-हुद्दा ‘निगेटीव्ह’ म्हणून दाखला देण्यात आला.

तिला आणखी रखडवून हॉटेलमध्ये अधिक दिवस रहावे असाच पालिका कर्मचार्‍यांचा उद्देश दिसून येत होता. अखेर तिच्या वडिलांनी त्यांना जेव्हा धमकावले की मी आज माझ्या मुलीला कोणत्याही परिस्थितीत घेऊन जाणार, तेव्हा ते नरमले व तिला वसईला घरी जाण्यास परवानगी दिली. आज एक आठवडा उलटून गेला तरीही तिच्या चाचणीचा रिपोर्ट नाही की पैसे भरल्याची पावती नाही. अजून ती विद्यार्थीनी ई-मेलची वाट पाहते आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com