मुंबई - गुजरातमधील सोहराबुद्दीन बनावट चकमकप्रकरणी दोषमुक्त ठरलेल्या पोलिस अधिकाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला. या दोषमुक्तीला आव्हान देणारे सोहराबुद्दीनच्या भावाचे अपील खंडपीठाने फेटाळले आहे.
सीबीआय न्यायालयाने राजस्थानमधील आयपीएस अधिकारी दिनेश एम. एन., गुजरातमधील आयपीएस अधिकारी डी. जी. वंजारा, राजकुमार पंडियन यांना दोषमुक्त केले आहे. या निर्णयाविरोधात सोहराबुद्दीनचा भाऊ रुबाउद्दीनने उच्च न्यायालयात याचिकेद्वारे आव्हान दिले होते. सीबीआयनेही गुजरात पोलिसांच्या गुन्हे शाखेचे अधिकारी एन. के. अमीन आणि राजस्थानचे पोलिस शिपाई दलपत सिंह यांच्या दोषमुक्तीच्या निर्णयाविरोधात अपील केले होते.
गुजरातमधील आयपीएस अधिकारी विपुल अग्रवाल यांना दोषमुक्त करण्यास सीबीआय न्यायालयाने नकार दिला होता. या निर्णयाविरोधात अग्रवाल यांनी उच्च न्यायालयात अपील केले होते. अग्रवाल यांचे हे अपील न्या. अनंत बदर यांनी मान्य केले. उरलेल्या पाच अधिकाऱ्यांविरोधातील अपील न्यायालयाने फेटाळले.
गुजरात आणि राजस्थान पोलिसांनी कट रचत 2005 मध्ये गुंड सोहराबुद्दीनचे एन्काउंटर केल्याचा आरोप आहे. सोहराबुद्दीनची पत्नी कौसर बी हिचे अपहरण करून तिचीही हत्या केल्याचा उल्लेख सीबीआयच्या आरोपपत्रात आहे. या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार तुलसी प्रजापती यालाही कालांतराने ठार करण्यात आल्याचा दावा आरोपपत्रात आहे.
या प्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने 2014 ते सप्टेंबर 2017 पर्यंत एकूण 38 आरोपींपैकी 15 जणांना दोषमुक्त केले होते. यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचाही समावेश आहे.
|