मुंबई - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणाऱ्या बारावी परीक्षेचे प्रवेशपत्र शुक्रवारपासून (ता. 18) विद्यार्थ्यांना दिले जाईल. कनिष्ठ महाविद्यालयाच्या लॉगिनमध्ये मिळणारी प्रवेशपत्रे कोणतेही शुल्क न घेता विद्यार्थ्यांना द्यावीत, अशी सूचना मंडळाने दिली आहे.
प्रवेशपत्रासंदर्भात काही तांत्रिक अडचणी आल्यास शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क करावा, असे आवाहन मंडळाने केले आहे. ऑनलाइन प्रवेशपत्राच्या प्रतीवर मुख्याध्यापक, प्राचार्यांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी. प्रवेशपत्रासाठी विद्यार्थ्यांकडून शुल्क घेऊ नये, असे निर्देश मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिले आहेत.
एखाद्या विद्यार्थ्याचे प्रवेशपत्र गहाळ झाल्यास संबंधित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाने पुन्हा त्याची प्रिंट काढावी. त्या प्रवेशपत्रावर लाल शाईने "द्वितीय प्रत' असा शेरा लिहून विद्यार्थ्यांना द्यावे, असे मंडळाच्या परिपत्रकात म्हटले आहे.
|