
संपकाळातील पगारावर एसटी कर्मचाऱ्यांना सोडावे लागेल पाणी
मुंबई : रजेशिवाय किंवा औचित्य न देता गैरहजर राहिल्याच्या कालावधीसाठी वेतनावर दावा करण्याचे निर्देश कोणालाही देता येणार नाहीत, त्यामुळे नो वर्क नो पे असा आदेश सर्वोच्च न्यायालयाचा असल्याने याची अंमलबजावणी एसटी महामंडळात केली जाणार आहे. त्यामुळे संपकाळात एसटी च्या सेवेतून बाहेर असलेल्यांना म्हणजेच कामावर गैरहजर असलेल्या काळातील एसटी कर्मचाऱ्यांना वेतनच देता येणार नाही असा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.
3 नोव्हेंबर पासून राज्यभरात सुरू झालेल्या बेकायदा संपात राज्यातील सुमारे 92 हजार एसटी कर्मचारी सहभागी झाले होते. सुमारे दोन ते अडीच महिने पूर्णतः एसटी कर्मचारी संपात सहभागी होते. दरम्यान बरेच एसटी कर्मचारी मधात कर्तव्यावर हजर झाले मात्र शेवटपर्यंत पाच महिन्यापर्यंत 40 ते 45 हजार कर्मचारी संपात सहभागी होते. त्यामुळे कामावर गैरहजर असलेल्यांना आता पगारापासून वंचीत राहावे लागणार आहे.
एसटीच्या विलीनीकरणाच्या मागणीसाठी हा संप पुकारण्यात आला मात्र, पाच महिने संप पुकारूनही धोरणात्मक आणि न्यायालयीन लढा संपकरी जिंकू शकले नाही. परिणामी आता एसटीचा पुन्हा श्रीगणेशा करतांना एसटी कर्मचाऱ्यांना स्वतःच्या आयुष्याची आणि कामाची नव्याने सुरुवात करावी लागणार आहे.
सुमारे 12 हजार बसेस प्रवासी सेवेसाठी सज्ज आहे. यादरम्यान काही किरकोळ नादुरुतीच्या अडचणी आल्यास तरी एसटीच्या वर्कशॉप मध्ये त्याची दुरुस्ती करता येणार आहे. नादुरुस्त बसेसची माहिती घेण्यात आली आहे.
- शेखर चन्ने, व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ
तब्बल पाच महीने बसेस आगारात उभ्या असल्याने बसेस मार्गस्थ बिघाड होऊ नये याची दक्षता घ्यावी लागणार आहे. त्यासाठी बॅटरी,टायर ,वंगण आणि इतर सुट्ट्या भागांची मोठ्या प्रमाणात गरज भासणार आहे. देनंदीनी दशदिनी व द्वैमासीक तपासण्या व त्याचा प्रोग्राम तातडीने राबवून प्रवाशांना सुरक्षीत व आरामदायक प्रवास एस टी चे कर्मचारी नक्कीच देतील.
- संदीप शिंदे, अद्यक्ष, राज्य एसटी कामगार संघटना
Web Title: Implementation Supreme Court Order No Work No Pay St Employees Salaries Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..