वाढत्या उन्हाचा पोल्ट्री व चिकन व्यवसायिकांना फटका

hen
hen

अलिबाग : उन्हाची काहिली वाढू लागली आहे. वाढत्या उष्म्याचा पोल्ट्री व चिकन व्यवसायिकांना फटका बसत आहे. उष्माघात, पाण्याची कमतरता व अधिक निगा यामुळे अधिक खर्च व नुकसान होत आहे. उत्पादन कमी झाल्याने चिकनचे भाव वधारले आहेत. 

गर्मीमुळे कोंबड्यांना उष्माघाताचे आघात (हिट स्ट्रोक) होतात आणि त्या दगावतात. त्यामुळे पोल्ट्री चालक व चिकन व्यवसाईकांना कोंबड्या शेल्टरमध्ये तापमान नियंत्रीत ठेवावे लागते. कोंबड्यांना पिण्यासाठी सतत पाणी द्यावे लागते. या दिवसात पाण्याचा तुटवडा असतो. पाण्याचा पीएच वाढलेला असतो. पाण्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव होतो. अधिक तापमानामुळे पिल्लांचे उत्पादन देखील कमी होते. त्यामुळे पिलांचे व कोंबड्यांचे भाव वाढतात. आणि परिणामी चिकन मार्केटमध्ये देखील चिकनचे भाव वधारतात. सध्या बाजारात चिकनचे भाव 180 ते 200 रुपये किलो आहेत. या आधी ते 160 रुपये किलो होते. चिकन मार्केटला देखील विक्रेत्यांना उष्म्यामुळे कोंबड्यांची नीट देखभाल करावी लागत आहे. 

सध्या हळदीचा हंगाम अधिक आहे त्यामुळे चिकनला मागणी अधिक आहे. मात्र ग्राहक जास्त प्रमाणात चिकन घ्यायचे असेल तर कमी दराने मागतात. पण घाऊक बाजारातच चिकनचे भाव वाढले असल्याने विक्रेत्यांना कमी दरात चिकन देणे परवडत नाही. 

पोल्ट्री चालकांचे नुकसान
बाजारात चिकणचे दर चढे असले तरी पोल्ट्री व्यवसायिकांना मात्र त्याचा फार थोडा वाटा मिळतो. कंपनी कोंबडीचे पिल्ले, खाद्य व औषधे देते. यामध्ये देखरेख, विजबील, तुस, पाणी याचा खर्च कंपनी देत नाही. कोंबड्या पिलांच्या पाच टक्के मृत्युस सुट असते. परंतु त्यापेक्षा जास्त कोंबड्या मेल्यास कंपनी त्याचे पैसे घेते. सर्वात मोठे संकट म्हणजे उष्मा किंवा रोग यामुळे मेलेल्या कोंबड्याची किंमत कंपनी पोल्ट्रीफार्म मालकाकडुन वसुल करते परिणामी त्याच्या हाती काहीच राहत नाही. मात्र स्वतः पिल्ले आणून हा व्यवसाय केल्यास तो फायदेशीर ठरतो.

उन्हाळ्यात काळजी
सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत डोळ्यात तेल घालून कोंबड्यांची काळजी घ्यावी लागते. गारव्यासाठी पंखे लावावे लागतात. आजूबाजूला पाणी मारावे लागते. छतावरती पेंढा ठेवावा लागतो.

''वाढत्या तापमानामुळे कोंबड्यांचा मृत्यु होतो. देखभालीसाठी खूप पैसा खर्च करावा लागतो. मेहनत घ्यावी लागते. मात्र या दिवसांत भाव चांगला मिळतो त्यामुळे पैसे बऱ्यापैकी वसूल होतात.''
- सचिन भोईर, पोल्ट्री व्यवसायिक

 ''कोंबड्यांना सतत पाणी पाजतो, पाणी मारतो, गारव्यासाठी  पंखे लावतो. कोंबड्यांवर वर लक्ष ठेवतो. चिकनची मागणी अजूनही कमी झालेली नाही. कोंबड्यांचे घाऊक दर वाढले आहेत.  मात्र ग्राहक वाढीव दर देतांना घासाघीस करतात.''
- हेमंत राऊत, चिकन विक्रेता, पाली

''उन्हाळ्यात खूप काळजी घ्यावी लागते. या दिवसांत बाजार बरा असतो. जास्त माल तयार होत नाही. त्यामुळे तुटवडा असतो. आणि भाव देखील वधारतात.''
- संतोष बावधने, पोल्ट्री व्यवसाईक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com