ठाण्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता धोका 

ठाण्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता धोका 

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील शहरी भागात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असताना, आता ग्रामीण भागातही कोरोनाने हातपाय पसरायला सुरुवात केल्याचे दिवसागणिक वाढणाऱ्या रुग्णसंख्येवरून दिसून येत आहे. ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 177 वर पोहोचली आहे. त्यामुळे जिल्हा आरोग्य विभागाला सतर्क राहून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी भर द्यावा लागणार आहे. 

ठाणे जिल्ह्यातील ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर, कल्याण–डोंबिवली या शहरी भागांमध्ये मागील दोन महिन्यांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढत होत आहे. शहरी भागात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाने ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे.

जिल्ह्यात कल्याण, अंबरनाथ, भिवंडी, शहापूर आणि मुरबाड हे पाच ग्रामीण तालुके आहेत. त्यात कल्याण, अंबरनाथ आणि भिवंडी या तालुक्यांच्या ग्रामीण भागांमध्ये मोठ्या प्रमाणात दाटीवाटीने नवी गृहसंकुले उभी राहिली. परिणामी, या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या नागरिकांमध्ये मुंबई आणि ठाण्यातील सरकारी आणि खासगी अस्थापनांमध्ये काम करणाऱ्यांची संख्या अधिक आहे.

समोर आलेल्या आकडेवारीवरून ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याला बहुतांश हेच नागरिक कारणीभूत ठरत असल्याचे दिसते. ग्रामीण भागातील 177 कोरोना रुग्णांपैकी सर्वाधिक 47 रुग्ण हे अंबरनाथ तालुक्यात आहेत. या पाठोपाठ भिवंडी ग्रामीण भागात 44, कल्याण ग्रामीण भागात 43 आणि शहापूर तालुक्यात 42 रुग्ण आढळून आले आहेत.

मुरबाड तालुक्यात केवळ एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला असून हा तालुका करोनापासून सुरक्षित आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात आढळून आलेल्या बाधितांपैकी बहुतांश हे मुंबई आणि ठाणे शहरातील आरोग्य विभाग, महापालिका प्रशासन, पोलिस विभागातील कर्मचारी आहेत. 

प्रशासनाकडून खबरदारी
  ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहे. या क्षेत्रामध्ये करोना रुग्ण आढळल्यानंतर तो परिसर तात्काळ प्रतिबंधीत क्षेत्र घोषित करण्यात येतो. त्यानंतर करोना रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घेऊन त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात येते. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने रांजणोली येथील टाटा आमंत्रा, शहापूर येथील जोंधळे महाविद्यालय आणि बदलापूर येथील बीएसयूपी इमारत अशा विविध ठिकाणी सुसज्ज विलगीकरण कक्ष उभारले आहेत. त्याचबरोबर रुग्ण आढळलेल्या ठिकाणी आशा, अंगणवाडी सेविका आणि जिल्हा परिषद शिक्षकांच्या मदतीने सर्वेक्षण करण्यात येते असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी मनीष रेंगे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com