केंद्र शासनाच्या अमृत योजने अंतर्गत कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात विविध कामे सुरू आहेत.
डोंबिवली - केंद्र शासनाच्या अमृत योजने अंतर्गत कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात विविध कामे सुरू आहेत. या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या 303.12 कोटी रक्कमेच्या प्रस्तावास शासनाची मंजूरी मिळाली आहे. जलकुंभ बांधणे, उर्ध्ववाहिनी व वितरण व्यवस्था, उदचंन केंद्र बांधणे, जलशुद्धीकरण केंद्र उभारणे या 4 प्रकल्पांची कामे यामुळे मार्गी लागणार आहेत. पालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी या 4 प्रकल्पांची निविदा प्रसिध्द करुन काम करण्याचे निर्देश संबंधित अधिका-यांना दिले आहेत.
केंद्र शासन पुरस्कृत अमृत 2 अभियानअंतर्गत महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील 4 कामांचा समावेश असून त्यास केंद्रीय स्तरावर मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये महापालिका क्षेत्रातील पाणी पुरवठा वितरण व्यवस्थेतील नवीन जलकुंभ बांधणे व मजबूतीकरण करणे या कामासाठी केंद्र शासनाने 48.25 लाख रुपयांच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. त्यात टिटवाळा, कल्याण पश्चिम व कल्याण पूर्व, डोंबिवली पश्चिम, पूर्व मिळून 10 नवीन जलकुंभ बांधण्याचे नियोजन आहे. सदर क्षेत्रात योग्य झोनिंग पद्धतीने पाणी पुरवठा करणे तसेच सखल व उंच भागात योग्य दाब नियंत्रण ठेवून सम प्रमाणात नागरीकांना पाणी देणे सोयीचे होणार असून पाणी गळती वा पाणी वाया जाण्याचे प्रकार टाळता येणार आहेत असे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
केडीएमसी मधील नव्याने विकसीत क्षेत्रामध्ये पाणी पुरवठा वितरण व्यवस्था विकसीत करणेसाठी केंद्र शासनाने 24.47 लाख रुपयांच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. महापालिका क्षेत्रात नव्याने विकसीत झालेल्या परिसरातील नागरीकांना पुरेसा पाणी पुरवठा करणेकरिता सदर ठिकाणी उर्ध्ववाहिनी व वितरण व्यवस्था करण्याचे नियोजित आहे. यामुळे नागरीकांना सम प्रमाणात पुरेसे पाणी देणे शक्य होईल आणि वितरण व्यवस्थेत होणारी गळती व वाया जाणा-या पाण्यावर नियंत्रण होईल.
मोहिली गाव येथे 275 दशलक्ष लिटर क्षमतेचे उदंचन केंद्र बांधून कार्यांन्वित करण्याच्या कामाकरिता केंद्र शासनाने 77.58 लाख रुपयांच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. महापालिकेच्या बारावे जलशुध्दी केंद्रास उल्हास नदीवरील मोहने उदंचन केंद्रामार्फत पाणी पुरवठा केला जातो. हे केंद्र सुमारे 40 ते 45 वर्षे जुने असून मोहने बंधा-या नजीक असल्याने उल्हास नदीच्या उर्ध्व भागात टाकलेला कचरा मोहने उदंचन केंद्राच्या चॅनेलमध्ये जमा होत असल्याने पंपींग वारंवार बंद होवून पाणी पुरवठ्यावर परिणाम होतो. तसेच मोहने बंधा-याजवळ वर्षानुवर्षे गाळ साचल्यामुळे पाणी पातळी अपुरी मिळते आणि पुरेशा पाण्याअभावी पंपामध्ये बिघाड होवून दुरुस्तीचा खर्च वाढत राहतो. यासाठी मोहने उदंचन केंद्र उध्व भागात मोहिली गावाजवळ स्थलांतरित करण्याचे नियोजीत आहे. याठिकाणी पाण्याची पातळी खोल असून पाणी स्वच्छ असल्याने नागरीकांना पुरेसा शुध्द पाणी पुरवठा करणे महापालिकेस शक्य होणार आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील गौरीपाडा येथे 95 दशलक्ष लिटर क्षमतेचे जलशुध्दीकरण केंद्र बांधून कार्यांन्वित करणे या कामासाठी केंद्र शासनाने 152.62 लाख रुपयांच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. महापालिका क्षेत्रातील नागरीकरण झपाट्याने वाढत असून सद्यास्थितीत बारावे, मोहिली व नेतीवली जलशुध्दीकरण केंद्रातून पूर्ण क्षमतेने पाणी पुरवठा होत आहे पण गौरीपाडा, ऊंबर्डे, सापाड इ. परिसर झपाट्याने विकसीत होत असल्यामुळे त्या ठिकाणी पाणी पुरवठा योजना अपुरी पडत असल्यामुळे अनेक ठिकाणी विकासकांमार्फत खाजगी टँकर द्वारे पिण्याचे पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे गौरीपाडा कल्याण पश्चिम येथे ९५ दशलक्ष लिटर क्षमतेचे जलशुध्दीकरण केंद्र बांधणे नियोजित आहे. जेणेकरुन योग्य व सम प्रमाणात पाणी पुरवठा करणे शक्य होणार आहे.
या 4 कामांसाठी 303.12 कोटी खर्च अपेक्षित असून सदर कामासाठी येणा-या प्रकल्प खर्चाच्या आर्थिक हिश्याचे प्रमाण केंद्र शासन 25 टक्के, राज्य शासन 45 टक्के व नागरी स्वराज्य संस्थेचा हिस्सा 30 टक्के इतका आहे. महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी या 4 प्रकल्पांची निविदा प्रसिध्द करुन काम करण्याचे निर्देश संबंधित अधिका-यांना दिले आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.