केडीएमसी निवडणुकीचे पडघम; समस्या त्याच, उमेदवारांसाठी आता जनतेचा जाहीरनामा

केडीएमसी निवडणुकीचे पडघम; समस्या त्याच, उमेदवारांसाठी आता जनतेचा जाहीरनामा

ठाणे : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीचे पडघम शहरात वाजू लागले आहेत. विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते निवडणूक कामाला लागले असताना आता डोंबिवलीकरांनीही आपल्या समस्या निवडणुकीआधीच उमेदवारांच्या लक्षात आणून देण्यासाठी कंबर कसली आहे. "डोंबिवली दक्ष नागरिक मंच'च्यावतीने यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. मंचातर्फे नागरिकांच्या विभागवार समस्या जाणून घेऊन त्यांचा समावेश दक्ष डोंबिवली नागरी सुविधा मागणी पत्रात केला जाणार आहे. महिना अखेरीस हे मागणीपत्र तयार करण्याचा मंचाचा मानस आहे. 

प्रभागातील नागरी समस्यांचे ऑनलाईन स्तरावर संकलन केले जाणार असून त्यांचे दक्ष डोंबिवली सुविधा मागणीपत्र तयार केले जाणार आहे. इच्छुक उमेदवारांकडून आणि संबंधित राजकीय पक्षांकडून या समस्या सोडवून घेण्यासाठी कृती आराखडा तयार करीत तो पक्षाच्या जाहीरनाम्यात समाविष्ट करण्याचा आग्रह नागरिक धरणार आहेत.

मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर विभागातील लोकप्रतिनिधींचे दर्शनही अनेकदा मतदारांना दुर्लभ होते. निवडणूक प्रचारात दिलेल्या आश्‍वासनांचा विसर उमेदवारांना पडतो. यापुढे असे होऊ नये त्यासाठी नागरिकांचा अप्रत्यक्ष सहभाग जाहीरनामा तयार करताना झाल्यास त्याची पुढील पाच वर्षांत अंमलबजावणीही होऊ शकते. परिणामी लोकशाहीची पाळेमुळे घट्ट होऊन जनमताचा अंदाज राजकीय पक्षांना येणार आहे. 

मागणीपत्र तयार करण्यासाठी दक्ष समूहातर्फे प्रत्येक विभागात एक समिती गठीत करण्यात येणार आहे. ही समिती त्या विभागातील नागरिकांचा कल जाणून घेऊन समस्यांची ऑनलाईन वेब पोर्टलद्वारे नोंदणी करेल. निवडणुकीआधी विभागातील इच्छुक उमेदवारांना हे मागणीपत्र सुपूर्द केले जाईल. यात नमूद केलेल्या समस्यांवर उमेदवाराचा कृती आराखडा काय असेल, हे जाहीर करण्यासाठी विनंती केली जाईल. उमेदवाराने कृती आराखडा कसा तयार करावा, याचे स्वातंत्र्य त्यांना असेल. 

समस्यांचे संकलन होणार 
मागणी पत्रातील समस्या सोडविण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याची जबाबदारी उमेदवारांची असेल. हा कृती आराखडा त्यांच्या जाहीरनाम्यात समाविष्ट करण्याचा आग्रह डोंबिवलीकर धरणार आहेत. शहर विकासाच्या केवळ आणाभाका देण्यापेक्षा नियोजन पद्धतीने उमेदवारांनी काम करावे, हीच यामागे डोंबिवलीकरांची इच्छा असल्याचे दक्ष नागरिक मंचच्यावतीने सांगण्यात आले. ऑक्‍टोबर महिना अखेरीस प्रभागातील समस्यांचे संकलन करण्याचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे दक्ष समूहाचे नंदू पालकर आणि अक्षय फाटक यांनी सांगितले. 
-----------------------
(संपादन : प्रणीत पवार)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com