मुंबई - राजस्थानातील सराफाच्या तेरा वर्षांच्या मुलाचे अपहरण करून 70 लाखांची खंडणी मागणाऱ्या वांद्रे येथील साजिद गुलाम मुस्तफीर बेग याला मुंबई पोलिसांनी सोमवारी बेड्या ठोकल्या आणि त्याच्या तावडीतून मुलाची सुखरूप सुटका केली. पोलिसांना पोचण्यास थोडा उशीर झाला असता तर कदाचित साजिदने मुलाचा जीव घेतला असता.
साजिद मूळचा राजस्थानचा रहिवासी असला, तरी सध्या वांद्रे येथे राहतो. त्याने आणि त्याच्या साथीदाराने महिनाभरापूर्वी फतेहपूर (राजस्थान) मधील सराफाच्या मुलाच्या अपहरणाचा कट रचला.
त्यासाठी त्याने लग्नाचे निमंत्रण देण्याचे निमित्त शोधले. साजिद 15 मे रोजी लग्नपत्रिका घेऊन सरफाच्या घरी गेला. त्या वेळी व्यापाऱ्याची पत्नी घरी होती. पती घरी नसल्याने तिने साजिदला आपल्या मुलासोबत दुकानात जाण्यास सांगितले. सराफाचा मुलगा आणि साजिद घराबाहेर पडले.
सराफाच्या मुलासह साजिद घराबाहेर पडला. त्याने मुलाचे अपहरण केले आणि 70 लाख रुपयांची खंडणी मागितली. मुलाच्या वडिलांनी फतेहपूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तपास सुरू केला; परंतु सात दिवसांनंतरही गुन्हेगाराचा थांग लागत नव्हता. साजिद वांद्रे परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सोमवारी पहाटे गुन्हे प्रकटीकरण कक्ष- 9 चे वरिष्ठ निरीक्षक महेश देसाई, सहायक निरीक्षक नितीन पाटील, शरद दराडे यांच्यासह राजस्थान पोलिसांच्या पथकाने साजिदच्या मुसक्या आवळून मुलाची सुटका केली. या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार फरारी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
साजिदवर 15 लाखांचे कर्ज होते. ते फेडण्यासाठी त्याने आणि त्याच्या साथीदाराने महिनाभरापूर्वी मुलाच्या अपहरणाचा कट रचला. त्याच्या साथीदाराने मुलाच्या घराची रेकी केली.
मुलाचे अपहरण करून साजिदने त्याला खासगी गाडीतून महाराष्ट्रात आणले. त्यानंतर पुण्यातून तो मुंबईत आला. पोलिस मागावर असल्याने त्याने फतेहपूर-मुंबई प्रवासात गाडीची नंबरप्लेट पाच वेळा बदलली. अपहृत मुलाला वांद्रे येथे एका ठिकाणी ठेवून तो खंडणीची मागणी करीत होता.
|