'रामायण' मालिका  बनवली आणि एका रात्रीत झाले यशस्वी; रामायण मालिकेच्या मेकिंगची कहाणी

'रामायण' मालिका  बनवली आणि एका रात्रीत झाले यशस्वी; रामायण मालिकेच्या मेकिंगची कहाणी

मुंबई : २५ जानेवारी १९८७ हाच तो दिवस ज्यादिवशी देशातल्या प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या कल्पनेतल्या प्रभू श्रीरामांना प्रत्यक्षात टीव्हीवर बघण्याची संधी मिळाली. कारण यादिवसापासून सुरु झाली 'रामायण' मालिका.. याच रामायण मालिकेच्या काही कहाण्या आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत.

१९८७ चा तो काळ. त्या काळात देशात काही श्रीमंत आणि ज्यांना टीव्ही घेणं शक्य आहे अशा काही लोकांकडेच टीव्ही होते. त्यामुळे रामायण टीव्हीवर येणार म्हंटलं की घराच्या आजूबाजूचे सर्व लोक ज्यांच्याकडे टीव्ही उपलब्ध आहे त्यांच्याकडे जात होते. इतकंच नाही तर या मालिकेत  प्रभू श्रीराम आणि सीता दिसताच लोकं टीव्हीची आणि त्यांची पूजासुद्धा करत होते. रामानंद सागर यांच्या मालिकेच्या पात्रांमध्ये लोकं त्यांच्या मनातल्या प्रभू श्रीरामांना आणि सीता मातेला शोधू लागले होते.  

रामानंद सागर यांच्या 'सागर आर्टस्' नावाच्या प्रोडक्शन कंपनीनं 'रामायण' आणि यासारख्या अनेक मालिका बनवल्या होत्या. देशात लॉकडाऊन सुरु असल्यामुळे लोक घरीच आहेत त्यामुळे डीडी चॅनेलनं पुन्हा रामायण मालिकेचं प्रसारण सुरु केलं आहे.
रामानंद सागर यांचे पुत्र प्रेम सागर यांनी An Epic Man - Ramanand Sagar या रामानंद सागर यांच्या जीवनावर आधारित पुस्तकात या मालिकेसंदर्भात काही खुलासे केले आहेत.

रामानंद सागर यांना अशी सुचली टीव्ही क्षेत्रात येण्याची कल्पना:

१९७६ ला रामानंद सागर यांच्या 'चरस' या चित्रपटाचं चित्रीकरण स्वित्झर्लंडला सुरू होतं. यावेळी त्यांचे सुपुत्रही त्यांच्यासोबत होते. त्यादिवसाचं चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर रामानंद सागर एका कॅफेमद्धे गेले. तिथे त्यांनी वाईन मागवली. तिथे असणाऱ्या वीकटीन त्यांच्यासमोर एक आयताकृती डब्बा आणून ठेवला आणि  तो उघडला. तो उघडताच रामानंद सागर यांनी  कलर टीव्ही जीवनात पहिल्यांदा बघितला आणि ते भारावून गेले. "मी आजपासून सिनेमा क्षेत्र सोडून टीव्ही क्षेत्रात कम करणार आहे, मला प्रभू श्रीराम, श्रीकृष्ण आणि दुर्गामाता यांच्यावर मालिका तयार करायच्या आहेत" असा निर्णय त्यांनी आपल्या साथीदारांना सांगितला. त्यांच्या या निर्णयावर अनेकांचं  दुमत होतं.

'रामायण'बाबत ऐकताच मित्रांनी फिरवली पाठ:

प्रेम सागर यांनी आपल्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे, रामानंद सागर रामायण व्हिडिओ कॅसेट्सच्या माध्यमातून पेक्षकांच्या समोर आणणार होते. मात्र त्यासाठी भरपूर पैशांची त्यांना गरज होती.  यासाठी त्यांनी प्रेम सागर यांना आपल्या परदेशातल्या मित्रांकडे पैशांची मदत मागण्यासाठी पाठवलं. मात्र अनेकांनी प्रेम सागर यांना विनम्रतेनं नकार दिला तर काहींनी रामानंद सागर यांची समजूत काढा असा सल्ला दिला. अनेक देश फिरूनही हाती काहीच न लागल्यामुळे प्रेम सागर यांना परत यावं लागलं.

असे शोधलेत रामायण मालिकेतील पात्र:

त्या काळात 'विक्रम आणि वेताळ' ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतील उतरत होती. त्यामुळे रामानंद सागर यांनी याच मालिकेतील  पात्र 'रामायण' मालिकेसाठी निवडले. ज्यामध्ये श्री रामांच्या भूमिकेसाठी अरुण गोविल यांची, सीतेच्या भूमिकेसाठी दीपिका चखलिया,लक्षमणच्या भूमिकेसाठी सुनील लाहरी तर हनुमानाच्या भूमिकेसाठी दारा सिंह यांची निवड करण्यात आली.

तत्कालीन सरकारचा रामायणला होता विरोध :

त्याकाळी देशात कॉँग्रेसचं सरकार होतं त्यामुळे रामायण दाखवलं तर देशात हिंदूंचा जागर होईल आणि यामुळे भाजपची व्होट बँक वाढेल असं त्यावेळच्या सरकारचं म्हणणं होतं. त्यामुळे तत्कालीन सूचना आणि प्रसारण मंत्री असलेल्या बी. एन. गाडगीळ यांनी या प्रसारणाला परवानगी नाकारली. मात्र दुसरीकडे प्रधानमंत्री राजीव गांधी यांची रामायण प्रदर्शित करण्यासाठी सहमति होती. अनेक प्रयत्नांनंतर ही मालिका प्रदर्शित करण्यात आली. 

जेव्हा हिमालयातून आला आदेश:

रामायण मालिका सुरू झाल्यानंतर हिमालयातून एक साधू रामानंद सागर यांच्याकडे आला. दिसायला हा साधू तरुण होता. रामानंद सागर यांच्यासाठी त्यांच्या गुरुजींचा आदेश तो घेऊन आला होता. अहंकार करू नको, रामायण बनवतो आहे तर कुठल्याही गोष्टीची चिंता करू नको असा आदेश घेऊन तो आला होता. रामानंद सागर तांच्यासाठी ही एक प्रकारची कामाची पावती होती,असं प्रेम सागर यांनी आपल्या पुस्तकात लिहिलं आहे.

know in detail about behind the scenes and making of ramayan serial

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com