
अलिबाग: रायगड जिल्ह्यातील भात पीक बहरले असतानाच दोन गेल्या आठवड्यापासून पाऊस पडत आहे. या संकटामुळे पीक आडवे झाले शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले. शेती तज्ज्ञांच्या अंदाजानुसार पावसाने दोन - चार दिवसांत उसंत घेतली नाही, तर सुमारे 40 टक्के उत्पन्न कमी होणार आहे. यंदा जिल्ह्यात एक लाख 14 हजार हेक्टर क्षेत्रावर भात पिकांची लागवड करण्यात आली आहे.
रायगड जिल्ह्यात खरीप हंगामात भात हेच प्रमुख पीक घेण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा हाच प्रमुख मार्ग आहे. मात्र, यंदा पावसाळा सरताना वाऱ्यासह धुवाधार बरसात झाली आहे. या अचानक आलेल्या संकटात बहुतांश ठिकाणी तयार झालेले पीक आडवे पडले आहे.
कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार यंदा जिल्ह्यात सुमारे एक लाख 14 हजार हेक्टर क्षेत्रावर भात पिकांची लागवड करण्यात आली आहे. सरासरी 3 हजार 216 मिमी पाऊस पडतो. यंदा त्यामध्ये मोठी वाढ झाली. आतापर्यंत सरासरी 3 हजार 533.34 मिमी पाऊस पडला. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून भात कापणीला सुरुवातदेखील झाली होती. परंतु पावसाळा सरताना पडलेल्या धुवाधार सरी कोसळल्याने नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांनी सांगितले की, जिल्ह्यात शनिवारी पडलेल्या पावसामुळे अधिक नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची धावाधाव झाली. अनेकांनी कापणी केलेले भात पाण्यात भिजून खराब होऊ नये यासाठी रोपे उचलून बांधावर ठेवली. रात्री आठ ते साडे आठवाजेपर्यंत पाऊस होता. त्यामुळे काही सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. 12 आणि 13 ऑक्टोबरला विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास जाण्याची भिती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.
रायगड जिल्ह्यात 3 ऑक्टोबरला पाऊस पडला. त्यानंतर शनिवारी पुन्हा बरसला. पाऊस असाच सुरु राहिल्यास सुमारे 40 टक्के भात पिकांचे नुकसान होऊन सुमारे 50 टक्के उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- चंद्रकांत मोकल,
को. चेअरमन, कृषी कमिटी, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स
भात तयार झाले आहेत. मुसळधार पाऊस पडल्याने भात पीक भिजून नुकसान होण्याची भिती आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
- प्रभाकर शां. नाईक,
शेतकरी
भात पीक तयार झाल्याने कापणीला सुरुवात केली. परंतू अचानक पाऊस पडल्याने भात भिजला. त्यामुळे मोठे नुकसान झाले. सरकारने कोकणातील शेतकऱ्यांकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
- दत्तात्रेय ठाकूर,
शेतकरी
पावसाचे वातावरण आहे. त्यामुळे कापणी केलेल्या पिकांना कोंब येऊन नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकऱ्यांनी सध्या कापणीची कामे करू नये. काही दिवस प्रतीक्षा करावी.
- पांडुरंग शेळके,
अधीक्षक जिल्हा कृषी अधिकारी
----------------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.