मुंबई - राज्यातील अडीच कोटींपेक्षा अधिक वीज ग्राहकांना वेळेत व अचूक वीजबिल मिळावे, तसेच ते भरण्यासाठी अधिक कालावधी मिळावा, याकरिता महावितरणने वीजबिलांची छपाई व वितरण केंद्रीय स्तरावर करण्यास सुरवात झाली आहे. देशात वीज वितरण क्षेत्रात हा प्रयोग प्रथमच होत आहे.
आधीच्या प्रक्रियेत बिलांच्या छपाईपासून ते ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी सात ते आठ दिवसांचा अवधी लागतो. वेळेत बिल न मिळाल्यामुळे त्वरित देयकप्रदान दिनांक अंतर्गत मिळणारी सूट (प्रॉम्ट पेमेंट डिस्काऊंट) मिळण्यात ग्राहकांना अडचणी येत होत्या. याशिवाय वेगवेगळ्या एजन्सींद्वारे बिलांची छपाई व वितरण होत असल्याने त्यावर नियंत्रण ठेवणे कठीण जात होते.
मोबाईल मीटर रीडिंगमुळे प्रत्यक्षवेळी (रिअल टाइम) मीटर वाचन, तसेच चेक रीडिंग उपलब्ध होत आहे. त्यामुळे या व्यवस्थेत जलद व दैनंदिन पद्धतीने बिलावरची संपूर्ण प्रक्रिया करण्यात येणार आहे.
महावितरणच्या मुख्यालयातील सर्व्हरवर बिल तयार करण्यात येणार आहे. ते परिमंडळ स्तरावर वितरणासाठी एजन्सीकडे 24 तासांत पाठवण्यात येईल. एजन्सीकडून हे बिल शहरी भागात 48 तासांत आणि ग्रामीण भागात 72 तासांत वितरित करण्यात येईल. दिलेल्या मुदतीत ग्राहकांना बिल न देणाऱ्या एजन्सींना दंड आकारण्यात येईल. यातून जास्तीत जास्त ग्राहकांना प्रॉम्ट पेमेंट डिस्काऊंटचा लाभ घेता येईल.
या नावीन्यपूर्ण प्रक्रियेमुळे ग्राहकसेवा गुणवत्तेत मोठी वाढ, वसुली कार्यक्षमतेत वाढ होईल. थकबाकी व वाणिज्यिक हानीत घट, मनुष्यबळाचे प्रभावी नियोजन, बिलिंग, छपाई व वितरण खर्चात मोठी बचत आदी लाभ होतील.
- पी. एस. पाटील, मुख्य जनसंपर्क अधिकारी, महावितरण
|