Devendra-Fadnavis
Devendra-Fadnavis

अस्वस्थ राज्यमंत्री खूष होणार

मुंबई - आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यमंत्र्यांना खूष करण्याचा प्रयत्न सरकारने घेतला आहे. तब्बल 17 महिन्यांच्या खंडानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (ता.9) राज्य मंत्रिपरिषदेची बैठक बोलावली आहे. काही राज्यमंत्री खात्याच्या बाहेर जाऊन प्रश्न विचारत असल्याने वैतागलेल्या फडणवीस यांनी मध्यंतरी मंत्रिपरिषदेची बैठक घेणे बंद केले होते. मात्र, राज्यमंत्र्यांमधील अस्वस्थता हेरून फडणवीस यांनी पुन्हा मंत्रिपरिषद बैठकीची प्रथा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मंत्रिपरिषद घेण्याचा पायंडा देवेंद्र फडणवीस यांनी पाडला होता. विभागाच्या प्रस्तावावर सखोल चर्चा व्हावी तसेच सरकारच्या निर्णय प्रत्येक राज्यमंत्र्यांचा सहभाग असावा असा हेतू मंत्रिपरिषदेच्या बैठकीमागे होता. मात्र, एका बैठकीत राज्यमंत्री रवींद्र वायकर, विजय शिवतारे, संजय राठोड यांनी खात्याच्या बाहेरचे प्रश्न उपस्थित करून फडणवीस यांची अडचण केली होती. तसेच काही राज्यमंत्र्यांनी थेट कॅबिनेट मंत्र्यांच्या विरोधात तक्रारींचा पाढा वाचायला सुरवात केली होती. राज्यमंत्री आक्रमक होऊ लागल्याने बैठकीला वेगळे वळण लागले होते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी मंत्रिपरिषदेची बैठक घेणे बंद केले होते.

राज्य मंत्रिपरिषदेची शेवटची बैठक 7 एप्रिल 2017 मध्ये झाली होती. आता तब्बल 17 महिन्यांच्या खंडानंतर उद्या मंत्रिपरिषदेची बैठक होत आहे. या बैठकीच्या निमित्ताने राज्यमंत्री कार्यालये आणि राज्यमंत्र्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारला याच महिन्यात चार वर्षे पूर्ण होत आहेत. सरकारचा अवघा एक वर्षाचा कालावधी शिल्लक आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लक्षात घेता सरकारला काम करण्यासाठी जेमतेम सहा ते आठ महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. यापार्श्वभूमीवर राज्यमंत्र्यांकडून अधिकार वाढवून देण्याचा आग्रह उद्याच्या बैठकीत धरला जाऊ शकतो.

लंच डिप्लोमसीला खंड
शिवसेना-भाजप युतीच्या मंत्र्यांमध्ये सुसंवाद असावा, खेळीमेळीच्या वातावरणात अनौपचारिक गप्पा व्हाव्यात, या हेतूने मंत्रिमंडळ बैठकीनंतर सर्व मंत्री एकत्र येऊन दुपारचे भोजन घेत होते. देवेंद्र फडणवीस यांनी सहभोजनाची कल्पना मांडली होती. त्यानुसार मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरील सभागृहात मंत्र्यांची पंगत बसे. मंत्री आपापल्या डब्यातील पदार्थ एकमेकांना खिलवायचे. मात्र, या "लंच डिप्लोमसी'ला सध्या "ब्रेक' लागला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com