कोरोना संकटात दुकानदारांनी अशी सुरू केली लूट

कोरोना संकटात दुकानदारांनी अशी सुरू केली लूट

अलिबाग ः कोरोना संसर्गाच्या परिस्थितीनुसार रायगड जिल्ह्यातील बहुतांश तालुके ऑरेंज झोनमध्ये आहेत. त्यामुळे तिसऱ्या लॉकडाऊनमध्ये अनेक मद्यविक्री, इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंसह अनेक दुकाने पुन्हा सुरू झाली. नागरिकांवरीलही काही निर्बंध कमी झाले. त्यामुळे खरेदीसाठी बाजारात गर्दी दिसत आहे; मात्र अनेक विक्रेत्यांनी त्याचाच फायदा घेत सुमारे 20 टक्‍क्‍यांपर्यंत भाववाढ केली आहे. कोरोनाचा मार झेलणारे सर्वसामान्य त्यामुळे मेटाकुटीला आले आहेत. काळाबाजार रोखण्यासाठी गेल्या महिन्यात जिल्हा प्रशासनाने प्रत्येक तालुक्‍यात पोलिस, महसूल आणि पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांचे पथक तयार केले होते. त्याचाही सध्या थांगपत्ता नाही. 

तब्बल दीड महिन्यांनंतर लॉकडाऊन शिथिल झाल्याचा आनंद जिल्ह्यातील नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसत होता. खरेदीच्या निमित्ताने ठिकठिकाणच्या रस्त्यांवर रहदारी दिसू लागली आहे. पोलिसांनीही नागरिकांना थोड दिलासा दिला. अलिबाग, रोहा, महाड, माणगाव येथील दुकाने उघडली आहेत. अत्यावश्‍यक सेवांबरोबच फर्निचर, स्टेशनरी, इलेक्‍ट्रॉनिक्‍स यासारखी दुकाने सुरू झाली आहेत. अशा परिस्थितीत काही दुकानदारांनी वस्तूंचे भाव वाढवले आहेत. ग्राहकांनी दिलेल्या माहितीनुसार ही वाढ तब्बल 20 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक आहे.

ग्राहकांची गरज ओळखून दुकानदार आणि व्यापाऱ्यांनी अचानक केलेली भाववाढ ही संतापजनक आहे, अशी प्रतिक्रिया अनेक ग्राहकांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली. प्रशासनाने कोरोना संकट आले त्या वेळी दुकानदारांनी भाववाढ करू नये, असे आवाहन केले होते. काही ठिकाणी समजही दिली होती. त्यासाठी पथक तयार केले होते, परंतु आता ते गायब आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. 
 
गर्दीमुळे भीती 
तिसऱ्या लॉकडाऊनमध्ये दिलेली सूट कोरोनाच्या संसर्गवाढीस कारणीभूत ठरू नये यासाठी पोलिस, आरोग्य विभाग शर्थीने प्रयत्न करीत आहेत; मात्र बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी होणारी गर्दी कोरोनाला आमंत्रण देणारी ठरण्याची भीती जाणकार व्यक्त करत आहेत. रायगड जिल्ह्यातील बहुतेक सर्व बाजारपेठांमध्ये बुधवारी ग्राहकांची मोठी गर्दी होती. या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगला हरताळ फासरण्यात आलेला दिसला. याबाबत निवासी जिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे यांनी सांगितले, की सरसकट बाजारपेठा सुरू करण्याचे कोणतेही आदेश नाहीत. सुरक्षित अंतर ठेवण्याची सक्ती सर्वांनाच बंधनकारक आहे. अर्थचक्र सुरू होताना जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव होणार नाही यासाठी शासकीय यंत्रणा बारकाईने लक्ष ठेवून आहे. 


मागील महिन्यातील दर / सध्याचे दर (प्रति किलो- रुपयांत) 
साखर - 37 / 45 
गोडेतेल- 148 / 165 
चवळी - 80 / 100 
मूगडाळ- 126/ 145 
बेसन- 80/ 100 
.

अनेक वस्तूंची भाववाढ करण्यात आली आहे. मटण 700 रुपये किलोने विकले जात आहे. त्यानंतरही ग्राहक या लुटीकडे दुर्लक्ष करत आहेत. ग्राहक संरक्षण समितीकडे लेखी तक्रार केल्यास झालेला गैरप्रकार शंभर टक्के उघड होतो. ग्राहकांनी जागरुक होऊन स्वतःहून तक्रार करण्यास पुढे आले पाहिजे. 
- मंगेश माळी, जिल्हा अध्यक्ष, जनजागृती ग्राहक मंच रायगड 
...... 
लॉकडाऊनच्या दरम्यान काळाबाजार रोखण्यासाठी सर्व दुकानदारांना चढ्या भावात विक्री करू नका अशी ताकीद देण्यात आलेली होती. या काळात ज्या तक्रारी आल्या होत्या, त्या दुकानदारांवर तत्काळ कारवाई करण्यात आली. छापील किमतीपेक्षा वाढीव दराने विक्री होत असल्यास तत्काळ कारवाई होते; मात्र व्यापारी पॅकिंग नसलेला माल विकत असल्याने कारवाई करता येत नाही. 
- आर. राठोड, सहायक नियंत्रक, वैद्यमापन शास्त्र, रायगड 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com