मुंबई - मराठी भाषेच्या अभिजात दर्जाचे प्रकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत गेले आहे. त्यामुळे लवकरच मराठीला अभिजात दर्जा घोषित होईल, असे मुख्यमंत्री फडणवीस आणि मराठी भाषा मंत्री विनोद तावडे सांगत राहिले. मात्र, आता हे प्रकरण साहित्य अकादमीकडे परत पाठवण्यात आले आहे. या घटनेमुळे मराठी जनतेचा संताप अनावर झाला असून, मुख्यमंत्री मराठीच्या अभिजात दर्जासाठी ठोस भूमिका केव्हा घेणार, अशी विचारणा डॉ. श्रीपाद जोशी यांनी केली आहे.
याबाबत श्रीपाद जोशी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाषा मंत्री विनोद तावडे यांना पत्र लिहिले आहे. यासंबंधात पंतप्रधानांकडे साहित्यिकांचे प्रतिनिधी मंडळ नेण्याचे मुख्यमंत्री या नात्याने बडोदा साहित्य संमेलनाचे उद्घाटन करताना त्यांनी जाहीर केले होते. आता या घोषणेला लवकरच दोन वर्षे होतील. सर्वपक्षीय शिष्टमंडळ यासंबंधात नेण्यात येईल, असे मराठी भाषा मंत्र्यांनी विधान परिषदेत आश्वासन दिले होते. याही आश्वासनाला आता वर्ष होत आले, अशी टीका जोशी यांनी पत्रात केली आहे.
मराठीची अवहेलना अशीच सहन करत राहायचे, की काही कणखर कृती करून आपल्या नेतृत्वाखाली या राज्याला मराठीला अभिजात दर्जा द्यावा यासाठी प्रयत्न करायचे, याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.
|