वीजपुरवठा नसलेल्या नागरिकांनी घ्या सौभाग्य योजनेचा लाभ

electricity
electricity

पनवेल - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 सप्टेंबर 2017 रोजी सुरु केलेल्या सहज बिजली हर घर योजना "सौभाग्य" या महत्वाकांक्षी योजनेंतर्गत महावितरणच्यावतीने ता. 31 डिसेंबर 2018 पर्यन्त विद्युतीकरण न झालेल्या कुटुंबांना वीज देऊन राज्यात 100 टक्के विद्युतीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्यात प्रत्येक घरात वीज पोहचावी यासाठी मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस व ऊर्जामंत्री ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे सातत्याने प्रयत्नशील असून त्यांच्या निर्देशानुसार महावितरणच्यावतीने सौभाग्य योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. 

सौभाग्य योजनेत शहरी व ग्रामीण भागातील विद्युतीकरण न झालेल्या घरांना वीजजोडणी देण्यात येणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल लाभार्थ्यांना ही वीजजोडणी विनाशुल्क देण्यात येणार असून, इतर लाभार्थ्यांना मात्र 500 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. हे 500 रुपये संबंधित लाभार्थ्यांने त्याच्या बिलातून 10 टप्प्यात भरावयाचे आहेत. मोफत वीज जोडणीसाठी लाभार्थी कुटुंबांची पात्रता 2011च्या सामाजिक, आर्थिक जातीच्या जनगणनेच्या आधारे निश्चित करण्यात येणार आहे. योजनेत वीजपुरवठा प्राप्त झालेल्या ग्राहकांना मासिक वीजबील भरणे बंधनकारक आहे. मात्र थकबाकीमुळे कायमचा वीजपुरवठा खंडित झालेली घरे, तात्पुरत्या शिबीरामधील स्थलांतरित होऊ शकणारी घरे तसेच शेतांमधील घरे या योजनेस पात्र ठरणार नाहीत.

या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरातील अंतर्गत वायरिंगसह एक चार्जिंग पॉईट, एक एलईडी दिवा मोफत देण्यात येणार आहे. तसेच अतिदुर्गम भागामध्ये ज्या ठिकाणी पारंपारिक विद्युतीकरण करणे शक्य नाही अशा घरांना सौरऊर्जा संचामार्फत वीजपुरवठा देण्यात येणार आहे. या ठिकाणी अंतर्गत वायरिंगसह एक डीसी पंखा, पाच एलईडी दिवे आणि एक डीसी चार्जिंग पॉईंट मोफत देण्यात येणार आहे. पंतप्रधान आवास योजना, शबरी योजना, रमाई योजना, आदीम योजना व इतर योजनेतून तयार झालेल्या घरांनासुध्दा मोफत वीजपुरवठा देण्यात येणार आहे.

सौभाग्य योजनेंतर्गत महाराष्ट्रात आतापर्यन्त झालेल्या सर्वेक्षणानुसार सुमारे 11 लाख 64 हजार 135 लाभार्थ्याना वीजपुरवठा देण्याचे उद्दिष्ट असून  यापैकी 7 लाख 67 हजार 939 लाभार्थ्यांना पारंपारिक पध्दतीने तर 21 हजार 56 लाभार्थ्यांना अपारंपारिक पध्दतीने वीजपुरवठा करण्यात येणार आहे. तसेच दारिद्रयरेषेखालील घरे व सौभाग्य योजनेत पात्र घरांना पूर्वी मंजूर झालेल्या पंडीत दिनदयाल ग्राम ज्योती योजनेंतर्गत राज्यातील ३ लाख 96 हजार 196 घरांना वीजजोडण्या देण्याचे काम सुरू आहे.

राज्यात वीजपुरवठा नसलेल्या नागरिकांनी सौभाग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या नजिकच्या कार्यालयाशी त्वरीत संपर्क साधावा किंवा 18002003435 / 18002333435 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com