मुंबई - मुंबईत 1993 मध्ये झालेल्या बॉंबस्फोटांना 12 मार्च रोजी 25 वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज येथे बॉंबस्फोटात जखमी झालेल्या कीर्ती अजमेरा यांना अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नाही.
अशा प्रकारच्या दुर्घटनांमधील मृतांच्या नातेवाइकांना आणि जखमींना नुकसानभरपाई मिळते की नाही, याची चाचपणी करण्यासाठी सरकारने स्वतंत्र समिती स्थापन करावी, अशी मागणी अजमेरा यांनी केली आहे. याबाबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे.
पत्रकार परिषदेत अजमेरा यांनी रविवारी (ता. 10) या संदर्भात माहिती दिली. 1993मध्ये झालेल्या भीषण साखळी बॉंबस्फोटांमध्ये अजमेरा यांना गंभीर दुखापत झाली होती. काचेचे अनेक तुकडे त्यांच्या शरीरात घुसले होते. शस्त्रक्रियेद्वारे ते बाहेर काढण्यात आले होते. अद्यापही त्यांच्या शरीरावर बॉंबस्फोटामुळे झालेल्या जखमा दिसतात.
उपचारासाठी अजमेरा यांना लाखोंचा खर्च आला. मात्र, सरकारने त्या वेळी जखमींसाठी केवळ पाच हजार रुपये जाहीर केले होते; तेही मिळाले नाहीत. त्यासंदर्भात सरकारच्या अनेक विभागांमध्ये खेटे घालूनही अद्याप यश आले नाही, अशी खंत अजमेरा यांनी व्यक्त केली. यासंदर्भात पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे.
|