पाणी मीटर महापालिकेच्याच खर्चाने स्मार्ट सिटी योजनेतून सुविधा 

पाणी मीटर महापालिकेच्याच खर्चाने स्मार्ट सिटी योजनेतून सुविधा 

ठाणे : शहरातील नागरिकांना 24 तास पाणीपुरवठा होण्यासाठी पाण्याचे मीटर उपलब्ध करून देणे ही अत्यावश्‍यक बाब आहे, पण यापूर्वी मीटरचा खर्च नागरिकांकडून वसूल करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता; मात्र आता स्मार्ट सिटीच्या माध्यमातून नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने मीटरचा खर्च नागरिकांवर लादण्याऐवजी महापालिकेच्या खर्चातून करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी नागरिकांना महापालिकेच्या वतीने पाण्याचे मीटर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. 

सध्या शहरातील विविध भागांमध्ये पाण्याचा उपसा प्रचंड प्रमाणात होत असतो, पण महापालिकेच्या वतीने कमी पाणी वापरणाऱ्यांना आणि जास्त वापरणाऱ्यांना एकाच वेळी सरासरी बिल दिले जाते. अशा वेळी या पाणी उपशाला शिस्त लावण्याबरोबर 24 तास पाणीपुरवठ्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्यासाठी मीटर बसवण्याचा निर्णय घेण्यात आला होता; मात्र स्मार्ट सिटी योजनेत कंत्राटदारांनी मीटर बसवण्याच्या कामात विशेष उत्साह दाखवला नाही.

विशेष म्हणजे या योजनेनुसार संबंधित मीटरची सुमारे चार ते आठ हजार रुपयांची किंमत नागरिकांकडून वसूल केली जाणार होती. तीन टप्प्यांतील बिलातून ही रक्कम वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यावरून लोकप्रतिनिधीसह नागरिकांचाही विरोध होण्याची शक्‍यता व्यक्त होत होती, पण या साऱ्या बाबी बाजूला सारत आयुक्तांनी मीटर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. 

स्मार्ट सिटी योजनेतील कामांबाबत आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत शुक्रवारी बैठक घेण्यात आली. या वेळी काही योजनांमध्ये करण्यात आलेल्या फेरबदलाची माहिती आयुक्तांनी दिली. महापालिकेने खासगी लोकसहभागातून राबवण्यासाठी सुमारे 190 कोटी रुपयांची योजना तयार केली होती. त्यानुसार प्रत्येक नळजोडणीवर मीटर बसवले जाणार होते. पाईपलाईन बदल आणि मीटरचा खर्च करण्यासोबतच कंत्राटदाराला सात वर्षे देखभाल करावी लागणार होती.

त्यासाठी महापालिका सुमारे 10 हजार रुपये तीन टप्प्यांत ठाणेकरांकडून जमा करून संबंधित ठेकेदाराला दिले जाणार होते; मात्र या योजनेला कोणत्याही ठेकेदाराने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे अखेर मीटर लावून देण्याचे काम महापालिकेकडूनच केले जाणार आहे. 

ठाणे शहरात 40 टक्के गळती 

सध्या ठाणे शहरात सुमारे 40 टक्के पाणी गळती होत आहे. त्यामुळे पुरेशा प्रमाणात पाणी असतानाही शहरात सर्वत्र पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. अशा वेळी मीटर लावल्याने पाण्याची गळती महापालिकेला कळणार आहे. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com