मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सॅटेलाईटमुळे काही तालुके दुष्काळातून वगळले हे पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांचे वक्तव्य अतिशय धक्कादायक आणि तितकेच गंभीर आहे. कारण मोदी काय किंवा फडणवीस काय, यांची दुष्काळ जाहीर करण्याची पध्दत शेतकरी विरोधी व विमा कंपन्यांच्या फायद्याची असल्यानेच लाखो शेतकरी वंचित राहिले असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.
लोणीकर यांच्या या वक्तव्याचा समाचार घेताना मुंडे म्हणाले की, लोणीकर बोलले ते अगदी खरे आहे. या सरकारचे दुष्काळ मोजण्याचे गणित आर्यभट्ट यांनाही समजणार नाही. कारण कमीत कमी दुष्काळ दाखवून विमा कंपन्यांना कोट्यावधी रुपयांचा फायदा मिळवून द्यायचा आणि शेतकऱ्यांना देशाधडीला लावायचे अशी सरकारची नियत आहे.
जालना जिल्ह्यातील कार्यक्रमात बोलताना मंत्री लोणीकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सॅटेलाईटमुळेच काही तालुके दुष्काळाच्या यादीतून वगळले असल्याचे वक्तव्य केले होते. मोदींची सॅटेलाईट सेवा दुष्काळ कसा तपासते आणि त्यामुळे आपल्याकडील काही तालुके कसे वगळले जातात, हे उदाहरणासह समजावून सांगताना या तालुक्यातील शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळणार नसल्याचे लोणीकर यांनी जाहीररीत्या मान्य करून टाकले आहे.
|