मुंबई: पूरस्थितीमुळे कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांतून मुंबईत दूध येऊ शकले नाही. त्यामुळे गुरुवारी (ता. 8) 10 लाख लिटर दुधाची टंचाई जाणवली. विक्रेत्यांनी गुजरात आणि मराठवाड्यातून अमूल व अन्य स्थानिक पुरवठादारांकडून दूध मागवल्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.
पूरपरिस्थितीमुळे टॅंकर वाहतूक शक्य नसल्याने दूध संस्थांनी संकलन करणे बंद केले. त्यामुळे मुंबईला गुरुवारपासून गोकुळ दुधाच्या टंचाईचा सामना करावा लागला. परिणामी अनेकांना अन्य कंपन्यांचे दूध घ्यावे लागले. काही जणांनी टंचाईची शक्यता ध्यानात घेऊन आधीच जादा दूध आणून ठेवले होते. हा साठा संपल्यानंतर अनेकांची अडचण झाली. नेहमीच्या कंपनीचे दूध मिळवण्यासाठी अनेकांनी सकाळी पायपीट केली; परंतु त्यांना मिळेल त्या कंपनीचे किंवा गोठ्यातून दूध घ्यावे लागले.
गोकुळ दूध आलेच नाही
पश्चिम महाराष्ट्रातील पूरस्थितीमुळे टॅंकर अडकून पडल्याने गुरुवारी मुंबईत गोकुळ दूध आले नाही. दररोज 600 लिटर गोकुळ दूध आणि 1400 लिटर इतर दुधाची विक्री होते. गुरुवारी गोकुळ दूध न आल्यामुळे अन्य कंपनीचे 300 लिटर दूध जास्त घेण्यात आले, असे वरळीतील विक्रेते शरद पाटोळे यांनी सांगितले. अमूल आणि महानंद या कंपन्यांच्या दुधाची सर्वाधिक विक्री झाली.
मालवणी मालाड भागातही गोकुळचे दूध न आल्यामुळे बहुतेकांना अमूल दूध अथवा गोठ्यांतून दूध घ्यावे लागले. काही व्यापाऱ्यांनी लिटरमागे दोन रुपये दरवाढ केली. गोकुळचे दूध शनिवारी उपलब्ध होण्याची शक्यता आहे, असे सांगण्यात आले.
मुंबईला दररोज 25 लाख लिटर सुट्या आणि 55 लाख लिटर पिशवीबंद दुधाचा पुरवठा होतो. सांगली, कोल्हापूर येथील पुरामुळे मुंबईत 10 लाख लिटर दुधाची टंचाई जाणवली. कमतरता भरून काढण्यासाठी गुजरातमधून अमुल, मराठवाडा, पुणे, सातारा येथून वारणा, कृष्णा, वाळवा, शाहू यांचे दूध मुंबईत आणत आहोत.
- प्रकाश कुतवळ, सचिव, दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघटना
|