
कुसुमाग्रज खूप मोठे लेखक, पण आपल्याच लोकांना आपण मोठं करत नाही; राज ठाकरेंकडून खंत
ठाणे- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते कुसुमाग्रजांच्या असंग्रहित कथा, कवितांचे प्रकाशन करण्यात आले. ठाणे येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. राज ठाकरे यांनी यावेळी कुसुमाग्रजांचे कौतुक केले. महाराष्ट्रात अनेक मोठ्या लोकांचा जन्म झाला आहे. पण, आपल्याच लोकांना आपण मोठं करत नाही, अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.
मी इंग्लंडला गेल्यावर शेक्सपिअरचं घर पाहिले. ते जपून ठेवण्यात आले होते. आमची माणसं किती मोठी होती. ती किती मोठी होऊन गेली हे सतत दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तो आपला नसतो. आपल्याकडे संमेलन भरतात. लोक येऊन बोलतात. पण, पुढे काही होत नाही, असं ते म्हणाले.
महाराष्ट्रातील राजकीय वातावरण गढूळ झालं आहे. त्यामुळे साहित्यिक, कवी यांनी याबाबत बोलायला हवं. कवींनी याबाबत बोलायला सुरुवात केली तर त्यांचेही महत्व वाढेल. असलेल्या परिस्थितीवर भाष्य करणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असंही ते म्हणाले.
किशोरी आमोणकर यांचं पुस्तकं प्रकाशन माझ्या हस्ते करण्यात येत होते. मी आमोणकरांना म्हटलं तुम्ही चुकीच्या माणसाला बोलावताय. विचार करा की आमोणकरांचं पुस्तक माझ्या हस्ते प्रकाशित करण्यात आलं. आम्ही चुकीच्या जागी जांभळासारखे जाऊन टपकतो, असं राज ठाकरे म्हणाले.
आजची महाराष्ट्रातील परिस्थिती वाईट आहे. मी राजकारणी आहे म्हणून सांगत नाही. काही कविता राजकारणी लोकांना समजली नाही तरी ती सामान्य माणसाला समजली पाहिजे. कोणाला मतदान द्यावं हे जनतेला कळलं पाहिजे, असं ते म्हणाले. इंडिया, भारत, हिंदुस्तान तिन्ही आपल्याला बोलायला काही लागत नाही, अशी टिप्पणीही त्यांनी केली.
आपले मराठी साहित्य दुसऱ्या भाषेत आले पाहिजे. आपली संस्कृती दुसऱ्या देशाला समजायला पाहिजे. कवी अशोक बागवे यांचे ऐकताना माझे प्राण कंठाशी आले होते. आजूबाजूच्या परिस्थिती वर कवी यांनी बोलले तरी बदल होईल, असं ते म्हणाले. (Latest Marathi News)