मनसेचे ‘इंजिन रुळावर कसे येणार?

MNS hopes to regain its base in Dombivali
MNS hopes to regain its base in Dombivali

डोंबिवली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासूनच पक्षाचा भक्कम बालेकिल्ला म्हणून डोंबिवलीकडे पाहिले जाते. सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याचे व दैनंदिन जीवनशी अत्यंत जवळचे असे अनेक  नागरी प्रश्न व समस्या हाती घेऊन, नाविन्यपूर्ण आंदोलने करुन महाराष्ट्रात नव्हे तर देशात चर्चेत रहाण्याचा प्रयत्न करण्यात डोंबिवलीचा मानसैनिक सातत्याने आघाडीवर राहून दिशादर्शक ठरला. असे असतानादेखील पक्षाला त्याचा अपेक्षित राजकीय लाभ न मिळता डोंबिवलीतील इंजिनाचा वेग मंदावू लागल्याने मनसैनिकांमध्ये अस्वस्थता वाढू लागली आहे.   

केवळ आंदोलनेच नव्हे तर अनेक वैविध्यपूर्ण सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रम यशस्वीपणे राबवून देखील कल्याण डोंबिवली महापालिकेत सता मिळविणे तर दूरच परंतु प्रभावी विरोधी पक्ष म्हणून सत्ताधारी सेना भाजपा युतीच्या मानमानी व अनागोंदी कारभारावर अंकुश ठेवण्यासही मनसे कमी पडते का? की सोशल मीडियावर जोरदार हल्लाबोल करुन ‘लाईक्स ‘मिळविणारे पदाधिकारी प्रत्यक्षात मतदारांशी संपर्क ठेऊन त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यात कमी पडतात.

पक्षाला साम,दाम,दंड अशा सर्वच आघाड्यांवर खंबीरपणे रसद पुरवून पक्षासाठी तन, मन, धनाने सदैव आघाडीवर असणाऱ्या कल्याण लोकसभा मतदार संघातील सक्षम युवा नेतृत्वाला पक्षप्रमुखांनी थेट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेतेपद दिले. अशी सर्व अनुकूल परिस्थिती असताना देखील पक्षाच्या भक्कम संघटन बांधणीसाठी व नगरिकांच्या मनसेवरील विश्वासाचे मतात रुपांतर होऊन ‘व्हिजन महाराष्ट्राचे’ प्रत्यक्ष सत्यात उतरविण्यासाठी कल्याण डोंबिवलीतील  स्थानिक पदाधिकारी नक्की कुठे कमी पडतात का? असा प्रश्न सर्वसामान्य मनसैनिकांना भेडसावत आहे.                 

अशा संभ्रमात पडलेल्या मनसैनिकांना व पदाधिकाऱ्यांना आपल्या गळाला लावून राजकीय  पोळी भाजण्याचा राजकीय डाव शिवसेना भाजपाचे धुरंधर नेते नक्कीच साधणार यात दुमत नाही.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेवेळी शिवसेन व भाविसेना यामधून महत्वाकांक्षेपोटी बाहेर पडलेली कार्यकर्त्यांची पहिली फळी व नंतर राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचे दिलेले प्रभावी विचार यांनी प्रेरित होऊन मनसेकडे वळलेली युवापिढी असे दोन प्रवाह डोंबिवलीत कायम समांतर चालताना दिसतात.

त्याचप्रमाणे मागून आलेले पुढे गेले यांची खंत यामुळे असलेली मनसेतील गटबाजी अनेक कार्यक्रम व आंदोलनात डोंबिवलीकरांना जाणवते परंतू आम्ही एकसंघच आहोत असा दावा करुन ही दुफळी अमान्य करणाऱ्या पदाधिकार्यांना संघटनात्मक पातळीवर ‘इंजिना'ला वेग देणे मात्र जमात नाही.                                                            

शिवसेनेसारख्या लढाऊ व आक्रमक संघटनेचे बाळकडू मिळालेल्या मनसैनिकांना ‘खळ खट्याक ‘करुन आंदोलन करणे सहज शक्य होते. परंतु हातात सत्ता नसल्याने आंदोलनात हाती घेतलेल्या समस्या सोडवून जनसामान्यांना दिलासा देणे येथील पदाधिकाऱ्यांना जमलेले नाही, महाराष्ट्राच्या व कल्याण डोंबिवलीतील विकासाच्या बाजूने भरघोस मते देऊन कल्याण डोंबिवलीतील जनतेने 2010 च्या पालिका निवडणुकीत मनसेचे तब्बल 27 नगरसेवक निवडून दिले. परंतु पाच वर्षानंतर 2015 च्या निवडणुकीत हेच संख्याबळ  घसरुन 9 या मनसेच्या लकी संख्येवर स्थिरावले.

यातून बोध न घेता पक्ष पातळीवर विस्कळीत झालेले मनसेचे इंजिन येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व मतभेद विसरुन एकदिलाने येथील मनसेचे नेते व पदाधिकारी कसे रुळावर आणणार व वेगाने पक्ष प्रमुखांचे व्हिजन कसे साकारणार हे अनुत्तरीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com