मुंबईकरांनो जरा जपून.... वाचा चिंता वाढवणारी बातमी

मुंबईकरांनो जरा जपून.... वाचा चिंता वाढवणारी बातमी

मुंबई: मुंबईकरांनी नियम पाळले नाहीत म्हणून मुंबईत पुन्हा लॉकडाऊन लावण्याचा इशारा देण्यात आला आहे. जिथे जिथे कोरोना रुग्णसंख्या वाढतेय तिथे कडक निर्बंध लावले जातील अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली असून लवकरच यावर निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान, मुंबईत कोरोना रुग्णांचा बरे होण्याचा दर म्हणजेच रिकव्हरी रेट कमी झाला असून गेल्या एका महिन्याच्या तुलनेत तो आता 79 टक्क्यांवर पोहोचला आहे. फेब्रुवारी आणि मार्च या कालावधीत मुंबईचा रिकव्हरी रेट 93 ते 95 एवढा होता. फेब्रुवारी महिन्यात मुंबईचा रिकव्हरी रेट 95 टक्क्यांवर होता. मार्चमध्ये 93 टक्क्यांवर गेला. पण आता एप्रिल महिन्यात हा दर कमी होऊन थेट 79 टक्क्यांवर घसलरा आहे. तसेच रुग्ण दुपटीचा कालावधीही 35 दिवसांवर आला आहे. याशिवाय, 4 ते 10 एप्रिलपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर हा 1.93 टक्के इतका झाला आहे.

मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी नऊ हजारांच्या घरात दैनंदिन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे, कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असताना बरे झालेल्या रुग्णांचा दर कमी होत असल्याकारणाने मुंबईच्या चिंतेत भर पडली आहे. गेल्या 13 दिवसांमध्ये मुंबईत जवळपास एक लाख नवीन रुग्णांची भर पडली आहे. 12 मार्च या दिवशी कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचा दर 93 टक्के होता. तो एका महिन्यात 79 टक्क्यांपर्यंत घटला. एकूणच कोरोनाव्हायरस वाढीचा दर 2 टक्क्यांवर आला आहे आणि रुग्ण दुप्पट होण्याचा दर 35 दिवसांवर घसरला आहे. गेल्या 23 तासांत 8 हजार 474  घरी रुग्णांना सोडण्यात आले असून आजारातून बरे झालेल्या लोकांची संख्या 40 लाख 60 हजार 87 इतकी आहे.

मुंबईच्या रिकव्हरी रेटची आकडेवारी-

1 एप्रिल दर - 84 टक्के
3 एप्रिल - 83 टक्के
4 एप्रिल - 82 टक्के
5 एप्रिल - 81 टक्के
7 एप्रिल - 80 टक्के
9 एप्रिल - 79 टक्के
10 एप्रिल - 79 टक्के
11 एप्रिल - 79 टक्के

एका महिन्यापूर्वी 12 मार्च या दिवशी एकूण रिकव्हरी रेट 93 टक्के होता. तर, रुग्णांची संख्या 1, 646 एवढी होती. रुग्ण वाढीचा दर ही कमी असून 0.35 टक्के एवढा होता. तर, रुग्ण दुपटीचा वेग ही वाढला असून 35 दिवसांवर हा दर आला आहे. जो 12 मार्च या दिवशी 205 दिवसांवर होता. म्हणजेच गेल्या दोन महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने मुंबईची चिंता वाढली आहे.

मृत्यूदर कमी असल्याने काहीसा दिलासा-

रिकव्हरी रेट जरी दिवसेंदिवस कमी होत असला तरी एकूण मृत्यूचे प्रमाण आणि दर कमी असल्याने ही एक दिलासादायक बाब आहे. सध्या चाचण्यांचे प्रमाण वाढल्याने दिवसाला 50 हजारांवर चाचण्या केल्या जात असून त्यात लक्षण असलेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. पहिल्या लाटेतही 18 ते 20 हजार चाचण्या केल्या जात होत्या. आता पूर्ण क्षमतेने चाचण्या केल्या जात आहेत. ज्याचा फायदा जरी होत असला, तरी रिकव्हरी रेटमध्ये लक्षणरहित रुग्णांना दुसऱ्या आठवड्यामध्ये जास्त काळजी घ्यावी लागते. ते घरीच रिकव्हर होतात. पहिल्या आठवड्यात जर बरं वाटत असेल तर गाफिल राहून चालत नाही. दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात ऑक्सिजनची पातळी मोजावी लागते. आता डॉक्टरांना उपचारांचे सर्व प्रोटॉकॉल माहिती झाले आहेत. दुसरी लाट ही कायम पहिल्या लाटेपेक्षा मोठी असते. डिसेंबर किंवा जानेवारीमध्येच ही लाट येईल अशी भीती होती. पण, दोन महिन्यांनंतरही लाट आली. त्यातच 2020च्या तुलनेत 2021 मध्ये अजूनही मृत्यू दर कमी आहे. ही बाब दिलासा देणारी आहे.
-राज्य टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी

(संपादन- विराज भागवत)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com