...म्हणून त्या मृतदेहाचे पुन्हा शवविच्छेदन करा; उच्च न्यायालयाचे निर्देश...

dead body.
dead body.

मुंबई : मागील एक महिन्याहून अधिक काळ राजावाडी रुग्णालयात असलेल्या मृतदेहाचे दुसऱ्यांदा शवविच्छेदन करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने रुग्णालयाला दिले आहेत. मुलाच्या मनातील संशय दूर व्हावा, यासाठी वडिलांच्या मृतदेहाचे दुसऱ्यांदा शवविच्छेदन करता येईल का, या न्यायालयाच्या प्रश्नाला राज्य सरकारने सहमती दिल्यामुळे न्यायालयाने असे निर्देश दिले.

चेंबूर येथे राहणाऱ्या रहिवाशाच्या मुलाने न्यायालयात याचिका दाखल केली होती. वडिलांचा मृत्यू चार जणांनी केलेल्या मारहाणीत झाल्याचा दावा त्यांनी केला आहे; मात्र वैद्यकीय अहवालानुसार त्यांचा मृत्यू ह्रदयविकाराने झाला, असे सांगण्यात आले. हा अहवाल कुटुंबियांनी अमान्य करत पुन्हा शवविच्छेदन करण्याची मागणी केली होती. तसेच, मृतदेह ताब्यात घेण्यासही नकार दिला होता. 

महिनाभरापूर्वी सार्वजनिक शौचालयामध्ये जाताना सोशल डिस्टन्सिंगवरुन झालेल्या वादावादीमध्ये चार जणांनी एका व्यक्तीला गंभीर मारहाण केली. कुटुंबियांनी त्यांना शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले; मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. याबाबत त्यांच्या मुलाने चेंबूर पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदविण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी केवळ मारहाणीचा गुन्हा दाखल केला. हत्येचा गुन्हा दाखल केला नाही. तसेच, शवविच्छेदन अहवालात मारहाणीचा उल्लेख नाही, असे याचिकादाराचे म्हणणे आहे.  न्यायमूर्ती ए. ए. सय्यद आणि न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या खंडपीठापुढे नुकतीच यावर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली. तेव्हा नातेवाईकांनी अद्याप मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे, अशी माहिती खंडपीठाला याचिकादारांच्या वतीने देण्यात आली.  

याचिकेत उपस्थित मागणी बाबत न्यायालय सहमत नाही, असे खंडपीठाने प्रारंभीच स्पष्ट केले; मात्र याचिकादार मुलाने त्याचे वडील गमावले आहेत. त्यामुळे त्यांच्या मनातील संशय दूर होण्यासाठी दुसऱ्यांदा शवविच्छेदन करणे शक्य आहे का, अशी विचारणा न्यायालयाने सरकारी वकिलांकडे केली. प्रशासन दुसऱ्यांदा शवविच्छेदन करण्यास तयार आहे, अशी माहिती सरकारी वकीलांनी दिली. तेव्हा न्यायालयाने पुन्हा शवविच्छेदनचे निर्देश दिले. 

रेल्वेकडून नवतंत्रज्ञानाचा वापर; घाट, बोगद्यात उपयोगी पडणार...

दोन दिवसांत अहवाल!
येत्या तीन दिवसांत अधिष्ठातांनी तीन डॉक्टरांची (ज्यांनी पहिल्यांदा शवविच्छेदन केले त्या डॉक्टरांशिवाय अन्य डॉक्टर) नियुक्ती करून पुन्हा शवविच्छेदन करावे आणि अहवाल द्यावा, असे निर्देश न्यायालयाने दिले. तसेच, त्यानंतर दोन दिवसांत मृतदेह ताब्यात घेऊ, अशी हमी याचिकादारांकडून देण्यात आली. जर त्यानंतर मृतदेहाचा ताबा कुटुंबियांनी घेतला नाही तर पोलिसांनी मृतदेहाचा अंतिम विधी नियमानुसार करावे, असेही  खंडपीठाने स्पष्ट केले. दरम्यान, दुसरा अहवाल प्रतिक्षेत असून मृतदेह कुटुंबियांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
--
संपादन : ऋषिराज तायडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com