डोंबिवली - सकाळच्या वेळी लोकल वर येणारा गर्दीचा ताण कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने एक निर्णय घेतला आहे. सुमारे 2 हजार रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वे रेल्वे ळेत बदल करत रेल्वेने लोकलवर येणारा गर्दीचा भार हलका करण्याचा प्रयत्न केला आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या बघता या निर्णयामुळे फारसा फरक पडणार नाही.
यासाठी काही शासकीय कार्यालय मुरबाड, वांगणी, नवी मुंबई, कर्जत सारख्या पट्ट्यात हलविण्यात यावी. अशी मागणी करणारे निवेदन उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता महासंघ संघटनेने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिले आहे.
पनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाने उपनगरीय रेल्वे प्रवाशांच्या समस्यांकरीता बुधवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. यावेळी राज यांच्यापुढे वरील म्हणणे संघटनेने मांडले आहे. यावेळी अध्यक्ष नंदकुमार देशमुख, सरचिटणीस लता अरगडे, उपाध्यक्ष अनिकेत घमंडी, मनोहर शेलार यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.
मध्य रेल्वेने सुमारे 2 हजार कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळेत बदल करत त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. मध्य रेल्वे मार्गावरील गर्दीचा भार कमी करण्यासाठी हा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सुमारे 38 लाख प्रवाशांच्या लोंढ्यापुढे 2 हजार प्रवाशांच्या वेळा बदलून गर्दीत फारसा फरक पडणार नाही. त्यासाठी मुंबईतील शासकीय, निमशासकीय कार्यालये मुरबाड, वांगणी, नवी मुंबई, कर्जत पट्ट्यात स्थलांतरित करावीत, त्याद्वारे गर्दीचे विभाजन होईल.
मध्य रेल्वेच्या माहितीनुसार ठाणे जिल्ह्यातून सुमारे 21 लाख प्रवासी मुंबईत जातात. बदलापूर, टिटवाळा, कल्याण, अंबरनाथ, उल्हानसगर, डोंबिवली, दिवा, मुंब्रा, कळवा, ठाणे या स्थानकांमधून लाखोंच्या संख्येत प्रवाशांचे लोंढे प्रवास करतात.
सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत मुंबईत आणि संध्याकाळी त्याच वेळेत मुंबईतून कर्जत दिशेकडे प्रवासी जातात. ठाणे जिल्ह्यात कसारा, आसनगाव, कर्जत, कर्जत पनवेल, या पट्ट्यात तुलनेने प्रवाशांची गर्दी कमी असते. त्या ठिकाणी सध्या जागा उपलब्ध असून त्या ठिकाणी कार्यालये स्थलांतरित झाल्यास गर्दी विभागाली जाईल आणि मुंबईवरील ताण कमी होईल याचा विचार करण्यात यावा असे मत महासंघाचे उपाध्यक्ष घमंडी यांनी व्यक्त केले.
मध्य रेल्वेचा निर्णय स्वागतार्ह आहे. रेल्वेने केले आता राज्य शासनाने करून दाखवावे अशी मागणी अध्यक्ष देशमुख यांनी व्यक्त केली. शासन स्तरावर हा निर्णय होणे अपेक्षित होते. 2014 मध्ये ठाण्यात तत्कालीन केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत गर्दीचे विभाजन आणि वेळा बदलणे यावर चर्चा झाली होती.
त्यासाठी प्रभु सकारात्मक होते. मात्र आता दहा वर्षांनी त्याची अंमलबजावणी रेल्वेने करण्याचा निर्णय घेतला असला तरीही गतिमान निर्णय घेणाऱ्या केंद्र सरकारने या गंभीर समस्येवर एवढी वर्ष का घालवली असा सवाल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी उपस्थित केला.
ठाणे, कल्याण, मुरबाड, वांगणी, नविमुंबई, पनवेल या ठिकाणी कार्यालये आल्यास प्रवास करायला रस्ता, रेल्वे जलवाहतूक असे पर्याय आहेत. त्यामुळे वाहन व्यवस्थेची गर्दी विभागली जाईल. सध्या मात्र मुंबई गाठण्यासाठी कसारा, कर्जत,खोपोली मार्गे येणाऱ्यांना अडीच तास जायला आणि यायला तेवढाच वेळ असे सुमारे 6 तास प्रवासात घालावे लागत आहेत.
तरीही गर्दी काही केल्या कमी होत नाही ही चिंताजनक बाब आहे. राज्य शासनाने ऍक्शन प्लॅन करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करायला हवी, गर्दीचे बळी वाढत जातील आणि सामान्यांच्या जीवाला कोणी वाली राहणार नाही. गर्दीत घुसमटत प्रवास करावा लागणार त्यात आबालवृद्ध सगळ्यांचे प्रचंड हाल होणार यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.