मुंबई: मुंबई महापालिकेकडे प्रकल्पग्रस्तांसाठी बोरिवली ते मलबार हिल आणि भांडुप, खार, चांदिवली येथे 17 हजार रिकामी घरे असल्याचे उघड झाल्याने माहुल प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासह महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सध्या प्रकल्पग्रस्तांचे माहुल येथे पुनर्वसन केले जात आहे; मात्र गैरसोय आणि प्रदूषणाच्या विळख्यामुळे प्रकल्पग्रस्त तिथे जाण्यास तयार नाहीत. पालिकेकडील रिकाम्या घरांमुळे हा प्रश्न सुटेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पालिकेला सध्या, सुमननगर, चेंबूर, बोरिवली, माहुल, मलबार हिल, भांडुप, सायन, धारावी, चित्ता कॅम्प, गोराई, देवनार, खार, चांदिवली, वाशी नाकाजवळ, लल्लूभाई कम्पाऊंड आदी ठिकाणी प्रकल्पग्रस्तांसाठी घरे मिळाली आहेत. 2012 पासून बांधलेल्या या इमारतींचा "एमएमआरडीए'ने नुकताच महापालिकेला ताबा दिला आहे. महापालिकेतर्फे केले जाणारे रस्ते व नद्यांचे रुंदीकरण आणि विकास, नाला रुंदीकरण आणि जलवाहिन्यांच्या दोन्ही बाजूला 10 मीटर जागा रिक्त सोडणे या कामांमुळे अनेक रहिवासी बाधित होतात. त्यांना पर्यायी घरे मिळत नसल्याने हे प्रकल्प आणि विकास योजना रखडतात. प्रकल्पग्रस्तांना त्यांच्याच परिसरात घर हवे अशी मागणी होते. इतके दिवस अशी घरे मिळत नसल्याने माहुलचाच पर्याय होता; मात्र तिथे जाण्यास रहिवाशांचा विरोध होता. आता मुंबईतील 19 ठिकाणी 17 हजार 203 घरे उपलब्ध झाल्याची कबुली पालिकेने दिली आहे. या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांना पर्यायी घरे देण्याची मागणी सत्ताधारी व विरोधकांकडून केली जाण्याची शक्यता आहे.
उपलब्ध घरांची ठिकाणे ः 19
एकूण इमारती ः 163
विंग ः 350
एकूण सदनिका ः 23,742
सध्या राहणारी बाधित कुटुंबे ः 6539
शिल्लक सदनिका ः 17,203
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.