मुंबई - ऍसिड हल्ला, तसेच बलात्कार झालेल्या महिलांच्या पुनर्वसनासाठी राबविल्या जाणाऱ्या मनोधैर्य योजनेअंतर्गत पीडितांना दहा लाख रुपयांची रक्कम दिली जाईल, अशी माहिती राज्य सरकारच्या वतीने शुक्रवारी उच्च न्यायालयात देण्यात आली. या योजनेअंतर्गत ज्या पीडित महिलांना तीन लाख रुपये मिळाले आहेत, त्यांना वाढीव रक्कम मिळणार का, हे मात्र स्पष्ट झालेले नाही.
ऍसिड हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेने राज्य सरकारकडून भरपाई मिळण्यासाठी याचिका दाखल केली होती. मनोधैर्य योजनेअंतर्गत यापूर्वी तीन लाख रुपयांची रक्कम संबंधित महिलांना दिली जात होती; मात्र न्यायालयाच्या निर्देशानंतर याबाबत फेरनिर्णय घेऊन ही रक्कम दहा लाख करण्याचा निर्णय सरकारने नुकताच घेतला. उपचारासाठी सुमारे 15 लाख रुपये खर्च झाला आहे. त्यामुळे वाढीव रक्कम मिळण्याची मागणी याचिकाकर्त्या महिलेने केली होती. सरकारच्या वतीने ऍड. हितेन वेणेगावकर यांनी सरकारच्या निर्णयाची न्यायाधीश आर. एम. सावंत आणि साधना जाधव यांच्या खंडपीठाला दिली. त्यावर खंडपीठाने समाधान व्यक्त केले.
|