मुंबई - राज्यातील 45 टक्के लोकसंख्या शहरांत राहते. त्यामुळे शहरे स्मार्ट होण्याची गरज आहे. हाच दृष्टिकोन ठेवून ठाणे शहरात पाच हजार 493 कोटींची गुंतवणूक होणार आहे, अशी माहिती ठाण्याचे अतिरिक्त पालिका आयुक्त सुनील चव्हाण यांनी मंगळवारी दिली.
"स्मार्ट सिटी आणि सिटी कनेक्ट' या परिसंवादात ते बोलत होते.
स्मार्ट शहरांतील नागरिकांच्या गरजा काय आहेत, ही माहिती घेण्याचे सर्वेक्षण आम्ही पूर्ण केले आहे. बहुतांश नागरिकांनी ठाणे रेल्वेस्थानकाच्या विकासाची मागणी केली. महिलांची सुरक्षा, 24 तास पाणीपुरवठा यांसारख्या गोष्टींचीही मागणी नागरिकांनी केली आहे. ठाणे महापालिकेनेही शहरासाठी काही विकास प्रकल्प राबवले आहेत. रस्ते विकास, पदपथ, सायकल ट्रॅकचा प्रकल्प यांसारख्या प्रकल्पांचा त्यात समावेश आहे. ठाणे व मुलुंड या रेल्वेस्थानकांच्या दरम्यान 15 एकर जमिनीवर "न्यू ठाणे' स्थानक उभारण्यात येणार आहे. यात सोलार रूफ टॉप, स्टेशन एरिया ट्रॅफिक इम्प्रुव्हमेंट स्कीम यांसारख्या प्रकल्पांचा समावेश आहे. महिलांसाठी विश्रांतिगृह व हिरकणी कक्ष यांसारख्या सुविधाही येथे असतील.
स्मार्ट शहरांकडे "ग्रीन सिटी' म्हणूनही पाहण्याची गरज आहे. पाणी, घनकचरा व विजेचे व्यवस्थापन, तसेच शहरे आणि नागरिकांचा विकास या संकल्पनांचाही विचार होण्याची गरज आहे, असे कॉन्फेडेरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीचे (सीआयआय) पॉलिसी आणि ऍडव्होकसीचे अध्यक्ष व्ही. नरेश यांनी व्यक्त केले आहे. स्मार्ट शहरांमधील मुख्य आव्हान कुशल मनुष्यबळाचे आहे. त्यामुळेच शहरांसाठी एकीकडे गुंतवणूक, विकासाचे मॉडेल ठरत असताना कुशल मनुष्यबळाकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे मत सीआयआयचे स्मार्ट सिटी विभागाचे अध्यक्ष सुनील खन्ना यांनी व्यक्त केले.
|