मुंबई - वांद्रे येथील गरीबनगर झोपडपट्टीवर मुंबई महापालिकेने सुरू केलेल्या अतिक्रमणविरोधी कारवाईला मुंबई उच्च न्यायालयाने पुढील आठवडाभरासाठी स्थगिती देत मुंबई महापालिकेला "जैसे थे'चा आदेश दिला आहे.
गरीबनगरमधील बेकायदा झोपड्यांवर काही दिवसांपूर्वी महापालिकेने कारवाई सुरू केली होती; मात्र कारवाईदरम्यान आग लागल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली. त्यानंतर पालिकेने धीम्या गतीने कारवाई सुरू केली होती. याबाबत स्थानिक नागरिकाने न्यायालयात याचिका केली आहे. महापालिकेला तूर्तास कारवाई करण्यास मनाई करावी. कारण अनेक जण बेघर होणार आहेत; मात्र त्यांच्या पुनर्वसनाबाबत महापालिकेने स्पष्ट माहिती दिलेली नाही, असे याचिकर्त्यांचे म्हणणे आहे.
न्यायाधीश वासंती नाईक आणि रियाझ छागला यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली. झोपडपट्टीतील रहिवाशांच्या पुनर्वसनाबाबत महापालिकेने काय भूमिका घेतली आहे, अशी विचारणा न्यायालयाने केली आहे. याबाबत लेखी तपशील सादर करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.
|