मुंबई - सातत्याने आगीच्या दुर्घटना घडत असताना शहरातील तीन लाखांपैकी दोन लाख 85 हजार इमारतींना आगीचा धोका कायम आहे. अवघ्या 15 हजार इमारती आगीपासून सुरक्षित असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. मुंबईतील फक्त पाच टक्के इमारती प्रत्येक सहा महिन्यांनी अग्निसुरक्षेचा दाखला अग्निशामक दलाला सादर करतात, असेही सूत्रांनी सांगितले.
महाराष्ट्र अग्निसुरक्षा कायद्यानुसार इमारतींमधील अग्निप्रतिबंधक यंत्रणा सुरू असल्याचा दाखला जानेवारी आणि जुलैमध्ये द्यावा लागतो. हा दाखला अग्निशामक दलाकडे नोंदणी असलेल्या सल्लागाराकडून तपासून देणे बंधनकारक आहे. सध्या मुंबईत तीन लाख इमारती आहेत. या प्रत्येक इमारतीला हे प्रमाणपत्र देणे गरजेचे असते. मात्र, अवघ्या पाच टक्के इमारती असे प्रमाणपत्र सादर करतात, अशी माहिती अग्निशामक दलाच्या एका अधिकाऱ्याने दिली. डिसेंबर 2017 पासून मुंबईत आगीच्या दुर्घटनांची मालिकाच सुरू झाली आहे. साकीनाका येथील फरसाण कारखान्याला लागलेल्या आगीत 12 कामागारांचा होरपळून मृत्यू झाला, तर कमला मिल कंपाउंडमधील अग्निकांडात 14 जणांचे बळी गेले. या घटनांमुळे झोपडपट्ट्या आणि इमारतींमधील अग्निसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता.
आगीच्या दुर्घटनांनंतर महापालिकेने स्थापन केलेल्या विशेष कक्षातील अधिकारी पालिकेच्या प्रभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांसोबत काम करणार आहेत. इमारती, कारखान्यांची पाहणी करून त्रुटी आढळल्यास तत्काळ कारवाई केली जाईल. पूर्वी नजीकच्या अग्निशमन केंद्रात हे प्रमाणपत्र जमा करावे लागत होते. मात्र, नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने पालिकेने ही पद्धत ऑनलाइन केली. मात्र, तरीही अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही, अशी खंतही एका अधिकाऱ्याने व्यक्त केली.
आगीच्या दुर्घटनांनंतर महापालिकेने अग्निशामक दलाचे विशेष कक्ष तयार केले आहे. या कक्षाचे अधिकारी शहरातील अग्निसुरक्षेची तपासणी करतील. त्यामुळे आता अग्निसुरक्षेबाबत विशेष खबरदारी न घेणाऱ्यांवर वचक ठेवणे सोपे होईल.
- प्रभात रहांदळे, प्रमुख अग्निशमन अधिकारी.
|