उन्हाच्या जोराने जलाशय आटले, प्राण्यांचा मानवी वस्तीत शिरकाव वाढतोय

उन्हाच्या जोराने जलाशय आटले, प्राण्यांचा मानवी वस्तीत शिरकाव वाढतोय

खर्डी : शहापूर तालुक्‍यात नैसर्गिक विपुलता असून येथे तानसा अभयारण्य आहे. परंतु ऐन उन्हाळ्यात पशू पक्ष्यांना या वनातील पाणवठे, तळे आणि डबके कोरडेठाक पडलेत; तर आजुबाजूला सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे, खासगी जमिनीचे सपाटीकरण आणि जंगलातील मानवनिर्मित वणवे यामुळे तेथील प्राणी पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे वळत आहेत.

पाण्याच्या शोधात रस्त्यावरून भटकंती करतानादेखील अनेक प्राण्यांचा अपघात होऊन मृत्यू होत आहे. गेल्या पाच वर्षांत 9 वन्यप्राणी मृत्युमुखी पडले असून त्यात विहिगाव येथे 3 बिबट्यांचा आणि एका तरसाचा नैसर्गिक मृत्यू झाला आहे. तर एका बिबट्याचा अपघाती मृत्यू झाला आहे. धसई येथे एका नीलगाईचा अपघाती मृत्यू झाला असल्याची माहिती वनविभागने दिली आहे. 

खर्डी परिसरातील अजनुप, शिरोळ, टेभा आणि बेलवड येथे काही दिवसांपासून बिबट्या मानवी वस्तीकडे येऊन बकऱ्या, कोंबडे व गाई यांचा फडशा पाडत आहेत. पाण्याच्या शोधात ते मानवी वस्तीत शिरत असल्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान मुंबई-नाशिक महामार्ग, समृद्धी महामार्ग, खासगी विकासक, एमआयडीसी व अन्य धरण प्रकल्पात डोंगर- टेकड्या भुईसपाट झाल्याने सह्याद्रीच्या कुशीतील हिरवेगार डोंगर नष्ट होत चालले आहे.

तानसा अभयारण्य क्षेत्रातील वन्यजीवांसाठी येथील नैसर्गिक पाणवठ्यांची साफसफाई केली असून त्यात टॅंकर व बैलगाडीच्या सहाय्याने पाणी टाकून वन्यजीवांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करण्याचे काम सुरू आहे.

- दर्शन ठाकूर, वनक्षेत्रपाल, वन्यजीव विभाग, खर्डी 

जंगल नामशेष झाल्याने बिबटे, भेकर, हरिण, ससे, रानडुक्कर, नीलगायी, वानर आदी वन्यजीव आपला जीव वाचविण्याच्या धडपडीत इतरत्र स्थलांतरित होत आहेत. यातील कित्येक वन्यजीव गाववस्तीत; तर काही आपली तहान भागविण्यासाठी पाणवठ्याच्या शोधात तानसा, वैतरणा व भातसा धरणाच्या पात्राकडे जाताना रात्रीच्या वेळेस रस्त्यावर येत आहेत. अशाच प्रकारे महामार्ग ओलांडून जाणाऱ्या अडीच वर्षाच्या एका बिबट्यास अपघात होऊन आपला नाहक जीव गमवावा लागल्याच्या घटना घडली होती.

वाढत्या शिकारीमुळे व महामार्गावरील अपघातांच्या घटनांमुळे वन्यजीवांची संख्या कमालीची रोडावत चालल्याचे धक्कादायक वास्तव नीलगाय, तरस व बिबट्याच्या अपघाती घटनेमुळे समोर आली आहे. 
खर्डी परिसरातील अजनुप, शिरोळ, टेभा व बेलवड येथे काही दिवसांपासून बिबट्या मानवी वस्तीकडे येऊन बकऱ्या, कोंबडे व गाई यांचा फडशा पाडत आहेत. याबाबत स्थानिक रहिवाशांमध्येही घबराट पसरलेली आहे. 

mumbai news due to nasty summers water bodies dried wild animals encroaching human areas


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com