मुंबई - मुंबईतील 813 शेतकऱ्यांची यादी राज्य सरकारकडे उपलब्ध नाही. ती बॅंकांकडे उपलब्ध आहे, अशी कबुली राज्य सरकारने माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना माहिती अधिकारात दिली.
राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या यादीतील 813 शेतकरी मुंबईतील असल्याचे आढळले होते. मुंबईत कर्जबाजारी शेतकरी असल्याचे जाहीर झाल्याने यावर चर्चा रंगली होती. त्यानंतर चौकशी करुनच संबंधितांना कर्जमाफी देण्यात येईल, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सारवासारव केली होती.
राज्यस्तरीय बॅंकांच्या समितीकडून कर्ज थकलेल्या शेतकऱ्यांची यादी राज्य सरकारला मिळाली होती. त्यामुळे ही माहिती सरकारकडे नसून, ती संबंधित बॅंकांकडे उपलब्ध आहे, अशी माहिती सरकारच्या सहकार व पणन विभागामार्फत गलगली यांना देण्यात आली.
मुंबई शहरात 694 शेतकरी असून, त्यांचे 45 कोटी चार लाख रुपयांचे कर्ज थकीत आहेत; तर मुंबई उपनगरांत 119 शेतकऱ्यांकडे 12 लाख रुपयांच्या कर्जाची थकबाकी असल्याचे बॅंकांच्या समितीने ढोबळमानाने कळवले असल्याची माहिती सहकार व पणन विभागाने गलगली यांना दिली.
|