मुंबई - मुंबईतील 34 रस्त्यांच्या कामात झालेल्या गैरव्यवहाराला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
रस्ते गैरव्यवहाराचा चौकशी अहवाल महापालिका आयुक्त अजोय मेहता यांना सादर करण्यात आला आहे. त्यात अधिकाऱ्यांच्या कामातील अनियमिततेवर ठपका ठेवण्यात आला आहे.
तत्कालीन महापौर स्नेहल आंबेकर यांनी रस्त्यांच्या कामामध्ये अनियमितता असल्याची तक्रार केल्यानंतर आयुक्त मेहता यांनी चौकशीचे आदेश दिले होते. चौकशीमध्ये 34 रस्त्यांच्या कामांमध्ये गैरव्यवहार झाल्याची बाब उजेडात आली होती. याप्रकरणी पालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले; तर सहा कंत्राटदार कंपन्यांना काळ्या यादीत टाकण्यात आले, त्यांची बिलेही रोखण्यात आली. काही कंत्राटदारांवर गुन्हे दाखल केले आहेत.
उपायुक्त रमेश बांबळे व चौकशी अधिकारी राजेंद्र रेळेकर यांची समिती नियुक्त करण्यात आली होती. मात्र, या समितीने अहवाल सादर करण्यात वेळकाढूपणा केला. आयुक्तांच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली होती. मुदतीत अहवाल सादर न झाल्यास तुमच्यावरही कारवाई केली जाईल, अशी तंबी आयुक्तांनी दिली होती. अखेर 34 रस्त्यांच्या गैरव्यवहाराबाबतचा चौकशीचा अहवाल मंगळवारी (ता. 26) सादर झाला.
|