रेल्वे पोलिस करणार 15 दिवसांत लिलाव
मुंबई - लोकलच्या प्रवासातील विसरभोळ्या प्रवाशांच्या वस्तू पोलिस त्यांना परत करतात. परंतु, चर्चगेट रेल्वे पोलिस ठाण्यात 12 वर्षांपासून अशा प्रवाशांच्या वस्तू पडून आहेत. त्या घेण्याकरिता कोणीच येत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. टीव्ही, मोबाईल, सोन्याची अंगठी अशा वस्तू पोलिसांच्या ताब्यात आहेत. या वस्तू घेण्याकरिता 15 दिवसांत संबंधित कोणी आले नाही, तर पोलिस लिलाव करणार आहेत.
लोकलमधून दररोज लाखो नागरिक प्रवास करतात. कित्येकदा ते लोकलमध्ये बॅग किंवा इतर मौल्यवान वस्तू विसरतात. या साहित्याबाबत रेल्वे नियंत्रण कक्षाला माहिती दिली जाते. त्यानंतर रेल्वे पोलिस लोकलमधील साहित्याचा शोध घेऊन ते प्रवाशांना परत करतात. खास करून हार्बर आणि पश्चिम मार्गावर वस्तू हरवल्याच्या तक्रारी अधिक आहेत. पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट पोलिस ठाण्यात 12 वर्षांपासून वस्तू पडून आहेत. 936 रुपये रोख, 27 हजार 200 रुपयांचे दोन टीव्ही, काळ्या रंगाची बॅगेसह परकीय चलन, राखाडी रंगाच्या बॅगेसह 27 हजार 20 रुपयांचे चार मोबाईल आणि 21 हजार रुपयांची सोन्याची अंगठी असा हा ऐवज आहे.
|