कृष्ण वड, गोरख चिंचेवर कलम करण्याचे दिव्य
मुंबई - सध्या दुर्मिळ वृक्षांना संजीवनी देण्याचे काम भायखळा येथील राणीच्या बागेत सुरू आहे. त्यांचे कलम करून निर्माण होणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी हा नैसर्गिक खजिना जपण्याचा प्रयत्न केला जात आहे.
कृष्ण वड, गोरख चिंचेवर कलम करण्याचे काम सध्या सुरू आहे.
राणीच्या बागेत प्रवेश केल्यावर भव्य खोडाचा गोरख चिंच पर्यटकांचे स्वागत करतो. हे झाड मुंबईत दुर्मिळ आहे. बाओबाबची झाडे राणीच्या बागेत कधी लावण्यात आली याची नोंद आढळत नाही; पण बाओबाब हे झाड 1861 पासून येथे असण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले.
गोरख चिंचबरोबरच कृष्ण वड हा दुर्मिळ वृक्ष राणीच्या बागेत आहे. हे झाड राणीच्या बागेव्यतिरिक्त मुंबईत इतरत्र क्वचित आढळते. त्याची पाने द्रोणाच्या आकाराची असल्याने त्यातून कृष्ण लोणी खात असे, अशी आख्यायिका आहे. या झाडाचीही काही रोपे तयार करण्यात आली आहेत. त्याच्या फांदीपासून नवे रोप तयार करणे; तसेच गुटी कलम- म्हणजे झाडाच्या फांदीला चीर देऊन आवश्यक पोषकतत्त्वे असलेल्या मातीचे मिश्रण बांधून नव्या रोपांना जन्म दिला जात आहे. त्याचबरोबर पांढरा वहावा, उर्वशी अशी आकर्षक फुलांचीही दुर्मिळ झाडे राणीच्या बागेत आहेत. त्यांचे जतन करण्याबरोबरच कलम करून नवे रोप तयार करण्याचे काम सुरू आहे.
हा निसर्गाचा खजिना आहे. त्याची माहिती येणाऱ्या प्रत्येक पिढीपर्यंत पोचण्यासाठी दुर्मिळ झाडांपासून नवे रोप तयार केले जात आहे.
- जितेंद्र परदेशी, उद्यान अधीक्षक
... तर मेहनतीला फळ
कलम केलेल्या झाडाच्या बियांपासून आलेले रोप जगण्याची शक्यता कमी असते. हे प्रमाण अर्ध्या टक्क्यापेक्षाही कमी आहे. या झाडांचे मूळ मुंबईत नसल्याने ती येथे वाढू शकत नाहीत अथवा तग धरू शकत नाहीत. या झाडांवर कलम करण्याची प्रक्रिया यशस्वी होण्यासाठी कोणत्या प्रकारची परिस्थिती आवश्यक आहे, याचा अभ्यास करून ती बदलता येऊ शकते. एखादे रोप बाळसे धरू लागले, तरी मेहनतीला फळ मिळते.
|