मुंबई - मुंबई विद्यापीठाने उत्तरपत्रिका गहाळ केल्याने निकाल जाहीर न झालेल्या विद्यार्थ्यांना आता धक्क्यावर धक्के बसू लागले आहेत. विधी शाखेच्या सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांपैकी 30 टक्क्यांहून अधिक विद्यार्थी नापास झाले आहेत. हा प्रकार लपवण्यासाठी संकेतस्थळावर निकाल जाहीर न करता त्याच्या प्रती महाविद्यालयांना पाठवण्यात येत आहेत.
विधी शाखेच्या सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्यात आले. त्यापैकी सुमारे एक हजार विद्यार्थी नापास झाले. एक नव्हे, तर दोनतीन विषयांमध्ये विद्यार्थी नापास झाले आहेत. माटुंगा येथील न्यू लॉ कॉलेजमध्ये विधी शाखेच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या डॉ. गिरीश गायकवाड या विद्यार्थ्याचाही निकाल धक्कादायक लागला आहे. तो तीन विषयांत नापास झाला आहे; तर एका विषयात त्याला सरासरी गुण देण्यात आले आहेत. "मी तीन विषयांत नापास होणे शक्यच नाही. त्यामुळे पूनर्मूल्यांकनासाठी अर्ज केला आहे,' असे गायकवाड यांनी सांगितले.
मुंबई विद्यापीठाच्या विविध शाखांच्या 11 हजार विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका गहाळ झाल्यामुळे त्यांचे निकाल थांबवण्यात आले होते; परंतु पाच हजार विद्यार्थ्यांचे निकाल महिनाभरापूर्वी जाहीर करण्यात आले. उर्वरित निकाल संकेतस्थळावर जाहीर करण्याऐवजी ते महाविद्यालयांना पाठवले जात आहेत. विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका हरवल्यानेच विद्यापीठाने हे पाऊल उचलल्याचे सूत्रांनी सांगितले.
|