मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या गुणपत्रिका 15 ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना मिळणार असल्याने परदेशी विद्यापीठात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, मात्र तरीही उशिरा निकाल लागल्याने विद्यार्थ्यांचे काही नुकसान होणार असेल तर परराष्ट्र मंत्रालयाची मदत घेतली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत बुधवारी दिली.
मुंबई विद्यापीठाचे सर्व निकाल 5 ऑगस्टपर्यंत जाहीर होतील आणि गुणपत्रिका सर्व विद्यार्थ्यांना 15 ऑगस्टपर्यंत मिळतील. त्यामुळे विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही, असा दावा फडणवीस यांनी विधान परिषदेत केला.
कॉंग्रेसचे आमदार संजय दत्त आणि शिवसेनेचे गटनेता अनिल परब यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. उत्तरपत्रिका तपासणीसाठी ऑनलाइन यंत्रणा चांगली आहे. यंत्रणेत अडचणी निर्माण झाल्यामुळे हे मूल्यांकन निर्धारित वेळेत होऊ शकलेले नाही. मात्र, या अडचणी तत्काळ दूर करून जाणीवपूर्वक यात कोणी काही केले असेल तर तपासून पाहिले जाईल, असे त्यांनी सांगितले. तीन लाख उत्तरपत्रिका कालपर्यंत तपासण्याचे बाकी होते, मात्र त्याची तपासण्याची गती वाढवण्यात आली असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
|