मुंबई - राजकीय पक्ष कायदा हातात घेऊन फेरीवाल्यांना पिटाळून लावीत आहेत. त्यामुळे फेरीवाल्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. फेरीवाल्यांचा घास हिरावून घेतल्यास त्यांचे आत्महत्या सत्र सुरू होईल, अशी चिंता महाराष्ट्र हॉकर्स युनियनने व्यक्त केली आहे.
सर्वेक्षण करून फेरीवाला धोरणाची तत्काळ अंमलबजावणी करा, अशी मागणी युनियनने केली आहे. फेरीवाल्यांना न्याय न मिळाल्यास पालिका आयुक्तांना घेराव घालण्याचा इशाराही युनियनने दिला आहे. एल्फिन्स्टन रोड येथे चेंगराचेंगरी झाल्यानंतर फेरीवाल्यांवर कारवाई सुरू करण्यात आली. रेल्वेस्थानकांच्या परिसरात फेरीवाल्यांविरुद्ध मनसेने कारवाई केली. फेरीवाल्यांवर कारवाई करताना राजकीय हस्तक्षेप झाल्यास मुख्यमंत्र्यांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी युनियनचे अध्यक्ष प्रद्युम्न वाघमारे यांनी केली आहे.
सरकारने फेरीवाला धोरणाची तातडीने अंमलबजावणी करावी. प्रभागनिहाय फेरीवाला झोन तयार करावा. प्रभागनिहाय समित्यांची फेररचना करावी. या समित्यांवर फेरीवाला प्रतिनिधींना स्थान द्यावे. 2014 मध्ये केलेले फेरीवाल्यांचे सर्वेक्षण रद्द करून नामांकित सामाजिक संस्थांकडून सर्वेक्षण करा. फेरीवाला संरक्षण कायद्यानुसार पात्र फेरीवाल्यांना विनाविलंब परवाना द्या आदी मागण्या युनियनने केल्या आहेत.
|