मुंबई - 'ऍट्रॉसिटी' कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झालेल्या मुंबई विद्यापीठातील पत्रकारिता व जनसंपर्क विभागाचे प्रमुख डॉ. संजय रानडे आणि प्रा. दैवता पाटील यांची अद्याप विद्यापीठाकडून चौकशी सुरू झालेली नाही.
या प्रकरणाला महिन्याभराचा कालावधी उलटूनही याबाबत काहीच हालचाली झालेल्या नाहीत. या प्रकरणासाठी चौकशी समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, अद्याप त्यावरही काहीच कार्यवाही झालेली नसल्याची माहिती उघडकीस आली आहे. निकाल दिरंगाईच्या प्रकरणापाठोपाठ मुंबई विद्यापीठातील "ऍट्रॉसिटी'च्या प्रकरणाचीही जोरदार चर्चा झाली. संज्ञापन व पत्रकारिता विभागातील सहायक प्राध्यापक डॉ. सुंदर राजदीप यांनी विभागप्रमुख डॉ. रानडे आणि प्रा. पाटील यांच्याविरुद्ध बीकेसी पोलिस ठाण्यात ऍट्रॉसिटीची तक्रार दिली होती. या दोघांनीही अपमानास्पद बोलून मारहाणीची धमकी दिल्याचे डॉ. राजदीप यांनी तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणाची दखल महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगानेही घेतली होती. आयोगासमोर सुनावणी झाली त्या वेळी या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले होते.
|