मुंबई - राज्यभरात शेतकऱ्यांचा संप दुसऱ्या दिवशी सुरूच असल्याने मुंबईतील भाजीपाल्याची आवक निम्म्याने घटली आहे. किरकोळ भाजी विक्रेत्यांना याचा मोठा फटका बसला आहे. भाजी मंडईत भाज्यांचे भाव कडाडल्याने शुक्रवारी मुंबईतल्या पदपथांवर विक्री करणाऱ्या भाजी विक्रेत्यांची संख्या घटली होती.
दादर, माटुंगा आणि मध्य मुंबईतील इतर भागातील किरकोळ भाजी विक्रेते दादरच्या क्रांतिसिंह नाना पाटील मंडई आणि स्वातंत्र्यवीर सावरकर मंडईतून घाऊक दराने भाजीपाला खरेदी करतात, मात्र दोन दिवस या मंडईतील आवक कमी झाल्याने भाजीपाला महागला आहे. "आम्ही दररोज सरासरी 80 ते 100 किलो भाजीपाला खरेदी करत होतो, मात्र संपाच्या पहिल्या दिवशी जेमतेम 50 किलो भाजी विक्री केली.
भाज्यांचे दर वाढल्याने दुकान बंद ठेवण्यावाचून पर्याय नाही', असे किरकोळ भाजी विक्रेते रावसाहेब शिंदे यांनी सांगितले. दादर, माटुंगा व माहीम या विभागातील बहुतांश छोट्या विक्रेत्यांनी आज दुकानेच सुरू केली नाहीत. भाज्यांचे भाव वाढल्याने व्यापाऱ्यांचा फायदा कमी झाला आहे, शिवाय उकाडा वाढल्याने भाजीपाला खराब होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे नुकसान सोसण्याऐवजी विक्री न केलेली परवडेल, असे माटुंग्यातील भाजी विक्रेत्या शीला वडकर यांनी सांगितले. संप असाच सुरू राहिला तर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
|