मुंबई - 'लोकशाही बळकटी करणासाठी लोकसहभाग असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या प्रक्रियेत युवकांना सामावून घेणे गरजेचे असून, मोबाईलचा उपयोग त्यासाठी निवडणूक आयोगाने करावा,'' असे आवाहन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी शुक्रवारी केले. निवडणुकांमधील मतदानाचा टक्का वाढण्यासाठी मतदान सक्ती करण्याबाबत विचार होणे आवश्यक आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. राज्य निवडणूक आयोगातर्फे लोकशाही पंधरवडा साजरा करण्यात येत असताना ते बोलत होते.
राज्यपाल म्हणाले, 'लोकशाही जीवनाची दिशा आहे. ती आपल्या देशाची सांस्कृतिक परंपरा आहे. गेली 69 वर्षे प्रत्येक टप्प्यावर लोकशाही सक्षम होण्यासाठी प्रयत्न केले गेले आहेत. महाराष्ट्रदेखील यात आघाडीवर असून, महिलांसाठी 50 टक्के आरक्षणाचा निर्णय घेऊन महिलांचा निर्णयप्रक्रियेत सहभाग वाढविण्याकरिता एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.'' निवडणूक प्रक्रियेत पैशाच्या ताकदीचा वापर वाढला, तर सामान्यांचा लोकशाहीवरील विश्वास राहणार नाही, असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले, 'निर्भय आणि मुक्त वातावरणात निवडणुका पार पडणे आवश्यक आहे. निवडणुकांमध्ये पैशाचा अतिरेकी वापर होतो ही चिंतेची बाब आहे. बऱ्याचदा निवडणुकीनंतर काही उमेदवारांकडून प्रतिमतदान मी इतके पैसे दिले अशी भाषा कानावर पडते, त्या वेळेस चिंतेत अधिकच भर पडते. पैशाचा हा वापर थांबला पाहिजे.'' काही लोक धोरणात्मक बाबींवर नेहमी बोलत असतात. परंतु ते मतदानाला जात नाहीत. मतदानसक्तीचा विचार यासाठी होणे आवश्यक आहे.
संविधानाने राज्याला जे अधिकार दिले आहेत, त्या अंतर्गत निवडणूक प्रक्रियेत अधिक सुधारणा करण्यासाठी निवडणूक आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमावी. त्या माध्यमातून याबाबत अभ्यास करून त्याचा अहवाल शासनाला सादर करावा. जेणेकरून कायद्यामध्ये अपेक्षित बदल करणे शक्य होईल, मुख्यमंत्री म्हणाले.
गेल्या दोन वर्षांत झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये 80 टक्के निवडणुका या शांततेत पार पडल्या आहेत. त्या बरोबरच मतदानाचे प्रमाणदेखील वाढले आहे. यात विद्यापीठे, गृहनिर्माण संस्था, टॅक्सी व हॉटेल असोसिएशन यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी नवीन कायदा करणे आवश्यक आहे.
- जे. एस. सहारिया, राज्य निवडणूक आयुक्त
|