
मुंबई - मुंबईकराना अधिकाधिक सुविधा देऊन जगातील अग्रेसर शहर बनविण्यासाठी राज्य सरकार कटीबद्ध असल्याची ग्वाही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. मुंबईत पूर्व द्रुतगती महामार्गावर शीव (सायन) येथे पूर्व - पश्चिमेला जोडणा-या पादचारी पुलाचे लोकार्पण राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आणि मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले.
सायन कोळीवाडा, धारावी, किंग्ज सर्कल या भागातील नागरिकांना सुरक्षितपणे पूर्व-पश्चिम असा रस्ता ओलांडण्यासाठी या पुलाचा उपयोग होईल. विशेष म्हणजे, जेष्ठ नागरिकांना उपयुक्त असे सरकते जिने असणारा मुंबईतील हा पहिलाच पादचारी पूल आहे.
पालकमंत्री केसरकर म्हणाले की, विद्यमान राज्य सरकारने आरोग्य, महिला सक्षमीकरण, मुंबई सुशोभीकरण, मंडया आणि कोळीवाड्यांचा विकास यासाठी वेगवेगळे प्रकल्प हाती घेतले आहेत. मुंबईतील नागरिकांना तसेच जेष्ठांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा सरकारचा मानस आहे. त्यामुळेच मुंबईत स्वच्छता, सुशोभीकरण, आपला दवाखाना यासारख्या नावीण्यपूर्ण सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
मुंबईतील जेष्ठ नागरिकांसाठी प्रवासाच्या सुविधेकरिता बेस्ट उपक्रमाकडून दहा बसेस उपलब्ध करून देण्यात येतील. न्यूयॉर्क येथील जेष्ठ नागरिकांना विरंगुळ्याच्या ठिकाणी बसने नेऊन त्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण उपलब्ध करून देण्याचा उपक्रम राबवला जातो. याच धर्तीवर मुंबईतील जेष्ठ नागरिकांनाही सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. त्यासाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून बेस्ट बसेस देण्यात येणार आहेत.
मुंबईतील कोळीवाड्यात स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून 'फूड ऑन ट्रक' ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच, महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा या अनुषंगाने व्यवसायासाठी जागाही पुरवणार असल्याचे सांगून मंडयांमध्ये दर्जेदार सुविधेचा भाग म्हणून लोअर परळ येथे वातानुकुलित मंडई उपलब्ध करून देणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या लोकार्पण सोहळ्यास स्थानिक खासदार राहुल शेवाळे, आमदार आशिष शेलार, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार कॅप्टन तमिल सेल्वन, आमदार प्रसाद लाड, उपआयुक्त रमाकांत बिरादार, माजी नगरसेविका राजेश्री राजेश शिरवडकर, प्रमुख अभियंता (पूल) संजय कौंडण्यपुरे आदी उपस्थित होते
सरकत्या जिन्याची सुविधा
या पादचारी पुलामुळे सायन कोळीवाडा, किंग्ज सर्कल, धारावी, गांधी मार्केट या परिसरात ये जा करणार्या नागरिकांना फायदा होणार आहे. पादचारी पुलाच्या दोन्ही बाजूला दोन सरकते जिने, सामान्य जिने आहेत. एकूण ४४ मीटर लांबीचा तर ४.१५ मीटर रूंदीचा हा पूल आहे. दिवसापोटी किमान ७ हजार ते ८ हजार नागरिक या पुलाचा वापर करतील, असा अंदाज आहे.
पूल बांधणीसाठी ५.६३ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. या पुलाचे काम ५२ महिने कालावधीत पूर्ण करण्यात आले. पुलामुळे गांधी मार्केटला जाण्यासाठीची सुविधा उपलब्ध होणार असून धारावीतून गांधी मार्केट आणि सायन कोळीवाडा येथे जाणाऱ्या नागरिकांना या पुलाचा फायदा होणार आहे. रस्त्यांवर होणारे अपघात टाळणेही शक्य होणार आहे. पूर्व द्रुतगती मार्गावरील वाहतूक विनाअडथळा सुरू राहण्यासाठी देखील या पुलाची मदत होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.