Mumbai University : पदवीधर सिनेट निवडणुकीची घोषणा की पुन्हा स्थगिती? भाजप नेते आशिष शेलारांची 'ती' तक्रार ठरणार निर्णायक!
शेलार यांनी १७ ऑगस्ट रोजी केलेल्या एका तक्रारीनंतर पदवीधर सिनेट निवडणुका स्थगित करण्यात आल्या होत्या.
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) पदवीधर सिनेट मतदार नोंदणीच्या याद्यांसंदर्भातील घोळानंतर न्यायालयाने निवडणुका पुन्हा घेण्यासाठी स्वतंत्र कार्यक्रम जाहीर करण्याकरिता २५ ऑक्टोबरची मुदत दिली आहे. त्यामुळे विद्यापीठ निवडणुका (University Election) जाहीर करणार की पुन्हा भाजप नेते आशिष शेलार यांनी केलेल्या नव्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर त्यांना स्थगिती देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) दिलेल्या निर्देशानंतर विद्यापीठाच्या सिनेट पदवीधर निवडणुकीचा मार्ग मोकळा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी पदवीधर सिनेट मतदार याद्यांच्या शुल्क भरण्यासंदर्भात प्राप्तिकर विभाग आणि ईडीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे निवडणुकीचा कार्यक्रम पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता काही तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
शेलार यांनी प्राप्तिकर आणि ईडी विभागाकडून चौकशी करण्याची मागणी करत मतदार नोंदणीच्या शुल्कामध्ये झालेल्या गैरकारभाराची माहितीही समोर आणली आहे. एकाच डेबिट कार्डवरून चार हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे शुल्क कसे भरले गेले, असा सवाल करत शेलार यांनी उच्चतरीय चौकशीची मागणी केली आहे.
शेलार यांनी १७ ऑगस्ट रोजी केलेल्या एका तक्रारीनंतर पदवीधर सिनेट निवडणुका स्थगित करण्यात आल्या होत्या. त्यानंतर न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर निवडणुका जाहीर होण्याची शक्यता असतानाच शेलार यांनी पुन्हा त्याविषयी आक्षेप घेतला असल्याने त्या पुन्हा काही महिन्यांसाठी लांबणीवर पडणार असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होईल, अशी भीती काही तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.