मुंबई - मुंबईत यंदाही 40 ठिकाणी पावसाचे पाणी भरण्याचा धोका लक्षात घेऊन पालिकेने त्याचा निचरा करण्यासाठी "ऍक्शन प्लॅन' तयार केला आहे. त्यासाठी विभाग पातळीवरील यंत्रणा तैनात करण्यात आली आहे.
मुंबईत 2011 मध्ये पावसाचे पाणी भरण्याची 55 ठिकाणे होती. ती संख्या आता 40 वर आली आहे. गेल्या वर्षी पावसाचे पाणी कुठे कुठे भरले, ते का भरते, तेथील भौगोलिक परिस्थिती कशी आहे, त्यावर काय उपाययोजना करता येतील याचा स्थानिक पातळीवर अभ्यास करण्याचे आदेश पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले होते. त्या दृष्टीने उपायोजना करण्यात आली होती. त्याचा सकारात्मक परिणाम झाला.
मुंबईत 50 मिलिमीटर पाऊस पडल्यास साचणारे पाणी वाहून नेण्याची क्षमता पालिकेच्या यंत्रणेत असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
मुंबईत दहिसर, मिठी, पोईसर, वाकोला, ओशिवरा येथील वालभट आदी नद्या आहेत. त्यातील गाळ काढण्याच्या कामाला वेग आला आहे. पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण केली जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली. यंदा नाल्यांमधील गाळ काढण्यासाठी निविदा प्रक्रियेला झालेला उशीर आणि कंत्राटदारांनी दाखविलेला निरुत्साह यामुळे नालेसफाईच्या कामाला उशीर झाला आहे. त्याचा फटका पावसात बसण्याची भीती व्यक्त होत आहे.
|