

मुंबई - महानगरपालिकेत प्रशासकीय शिस्त आणि नियमांना हरताळ फासला जात असल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पालिकेच्या बदल्या आणि नियुक्त्यांच्या प्रक्रियेत थेट पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या आदेशालाच नगर अभियंता रामचंद्र कदम यांनी धाब्यावर बसवल्याचे वृत्त आहे. जाणीवपूर्वक पदोन्नती नाकारणाऱ्या आणि तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण न झालेल्या काही विशिष्ट सहाय्यक अभियंत्यांवर मेहेरनजर दाखवण्यासाठी नियमांना बगल देण्याचा प्रयत्न नगर अभियंत्यांकडून सुरू असल्याची माहिती खात्रीशीर सूत्रांनी दिली आहे. महापालिका आयुक्तांचे मनाई आदेश असताना देखील असा प्रस्ताव तयार केल्याने पालिका वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.