रहस्यकथाकाराच्या बेपत्ता होण्याचे ‘रहस्य’ कायम

रहस्यकथाकाराच्या बेपत्ता होण्याचे ‘रहस्य’ कायम
रहस्यकथाकाराच्या बेपत्ता होण्याचे ‘रहस्य’ कायम

मुंबई : ज्येष्ठ रहस्यकथाकार गुरुनाथ नाईक बेपत्ता झाले आणि वसईतील त्यांचे चाहते, आप्तपरिवार यांचे धाबे दणाणले. महाराष्ट्राला आपल्या रहस्यकथांनी एकेकाळी वेड लावलेल्या या कथाकाराची प्रकृती हल्ली ठीक नसते. वैद्यकीय उपचारांसाठीच त्यांना गोव्याला जायचे होते. त्यासाठी ते रेल्वेचे आरक्षण करण्यासाठी गेले आणि तेथील गर्दीत ते हरवले. त्यांच्या शोधासाठी सर्वांनी आकाशपाताळ एक केले. पत्नी गीता यांनी पोलिसांकडे धाव घेतली. मंगळवारी सकाळी आठ-साडेआठपासून त्यांचा शोध सुरू होता. अखेर मध्यरात्रीच्या सुमारास एक दूरध्वनी आला आणि सगळ्यांना हायसे वाटले. वसईच्या समुद्रकिनाऱ्यावर एका व्यक्तीला ते सापडले होते. पण त्यांच्या बेपत्ता होण्यामागचे ‘रहस्य’ उलगडलेले नाही.

नाईक यांचे वय आता ८२ आहे. गेल्या काही महिन्यांपासून ते वसईतच असतात. सोबत पत्नी आणि मुलगा मंगेश असतो. तब्येत बरी नसते. त्यामुळे वैद्यकीय उपचारांसाठी गोव्याला जाण्याचे त्यांनी ठरविले. त्याकरिता रेल्वेचे आरक्षण करण्यासाठी म्हणून ते पत्नी गीता यांच्यासोबत घराबाहेर पडले. तिकीट काढल्यानंतर घरी निघाले; पण रस्त्यावरील गर्दीत त्यांची पत्नीशी चुकामूक झाली. ते कुठे दिसेनातच म्हटल्यावर त्याही घाबरल्या. निकटवर्तीयांना कळविले. सर्वांनी त्यांचा शोध सुरू केला. संपूर्ण दिवसभर तो सुरू होता. अखेर माणिकपूर पोलिसांनाही कळविण्यात आले. रात्रीचे बारा वाजत आले तरी त्यांचा पत्ता लागलेला नव्हता. अशात त्यांचा मुलगा मंगेश याला एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून दूरध्वनी आला. वसई गावात समुद्रकिनारी गुरुनाथ नाईक आम्हाला सापडले आहेत. त्यांच्याकडे हा मोबाईल क्रमांक मिळाला. त्यांना तुमच्या पत्त्यावर आणून सोडतो, असे दूरध्वनी करणाऱ्याने सांगितले. त्यानंतर रात्री एक वाजता त्याने नाईक यांना वसई रेल्वेस्थानकात आणून कुटुंबीयांकडे सुपूर्द केले आणि सगळ्यांचा जीव भांड्यात पडला.

कथेचा शेवट गोड!
गुरुनाथ नाईक एवढ्या लांब, आठ किलोमीटर अंतर चालून समुद्रकिनारी गेले कसे, हा मात्र प्रश्‍नच होता. त्यांना विचारल्यावर ते एवढेच म्हणाले, की ‘मी एवढे अंतर कसा गेलो, वसईत कसा पोहोचलो हे मलाच समजत नाही. काही भल्या लोकांनी मदत केली म्हणूनच मी घरी येऊ शकलो...’ रहस्यकथाकारांच्या बेपत्ता होण्याचे हे रहस्य कायम असले, तरी या कथेचा शेवट गोड झाला याचाच त्यांच्या आप्त आणि चाहत्यांना आनंद होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com