मुंबईः अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर असभ्य वर्तणूकीचे आरोप केले होते. या आरोपांवर स्पष्टीकरण देण्यासाठी नाना पाटेकर यांनी आज (सोमवार) पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. मात्र, त्यांनी एका मिनिटातच पत्रकार परिषद आटोपली.
'माझ्या वकिलांनी या विषयावर न बोलण्याचा सल्ला दिला आहे. जे दहा वर्षांपूर्वी बोललो तेच खरे आहे. सत्य आहे ते कायम सत्यच राहते,' असे सांगत नानांनी पत्रकारांशी बोलण्यास नकार दिला.
2008 साली ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटादरम्यान नानांनी माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असभ्य वर्तन केले, असा आरोप तनुश्री दत्ता हिने एका मुलाखतीत केला. यानंतर नाना पाटेकर यांनी तनुश्रीचे आरोप फेटाळून लावत तिला कायदेशीर नोटीस बजावली होती. ‘तनुश्रीला कायदेशीर नोटीस पाठवली असून ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत काहीच बोलता येणार नाही. तसेच वकिलांनी मला प्रसारमाध्यमांशी बोलण्यास मनाई केली आहे,’ एवढेच नाना म्हणाले.
दरम्यान, तनुश्री दत्ता हिने केलेल्या आरोपावर मौन बाळगून असलेले नाना पाटेकर आज काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ‘हाऊसफुल्ल 4’ च्या चित्रिकरणासाठी नाना पाटेकर मुंबईबाहेर होते. नुकतेच ते मुंबईत परतले. विमानतळावर जमलेल्या माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना तनुश्रीच्या आरोपांवर प्रश्न विचारले मात्र नाना पाटेकर यांनी माध्यमांच्या प्रश्नांवर प्रतिक्रिया व्यक्त करणं पूर्णपणे टाळले होते. दुसरीकडे तनुश्री दत्ता हिने ओशिवरा पोलिस ठाण्यात नाना पाटेकर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत कोरिओग्राफर गणेश आचार्य, निर्माता सामी सिद्दीकी, दिग्दर्शक राकेश सारंग, आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांचादेखील उल्लेख आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.