Mumbai News : नाशिक-मुंबई रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न

आमदार सत्यजीत तांबे यांच्या तक्रारीची मुख्यमंत्र्यांकडून तातडीने दखल.
Eknath Shinde Meeting
Eknath Shinde Meetingsakal

मुंबई - नाशिक-मुंबई रस्त्यावर भिवंडी व ठाणे दरम्यान होणारी प्रचंड वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी बैठक घेऊन संबंधितांना ही समस्या त्वरित सोडवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. वाहतूक कोंडी सोडवण्याबाबत ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष कृतीदलाची स्थापना करण्यात आली आहे.

शनिवारी या कृतीदलाची पहिली बैठक आयोजित करण्यात आली आहे. आमदार सत्यजीत तांबे यांनी काही दिवसांपूर्वी या समस्येबाबत मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले होते. मुख्यमंत्र्यांनी त्याची तातडीने दखल घेत शुक्रवारी बैठक घेतली व वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सर्व शक्य ते उपाय करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.

आमदार सत्यजीत तांबे अधिवेशनात हजर राहण्यासाठी नाशिकवरुन मुंबईला येताना त्यांना देखील या वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागले होते. आ. तांबे भिवंडी वरुन कल्याण रेल्वे स्थानकात जावून तिथून ते मुंबईला उपनगरीय रेल्वेने रवाना झाले होते. त्यांनी या घटनेची माहिती देणारे ट्वीट केले होते व त्यांनी अधिवेशनात देखील हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर या प्रश्नी मुख्यमंत्री कार्यालयाने गांभीर्याने दखल घेतली व थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही समस्या सोडवण्यासाठी बैठकीचे आयोजन केले.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या उच्चस्तरीय बैठकीला सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, रस्ते विकास मंत्री दादा भुसे, मनिषा म्हैसकर, ठाण्याचे जिल्हाधिकारी, ठाण्याचे पोलिस आयुक्त, ठाणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक, राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व इतर अधिकारी उपस्थित होते.

या मार्गावरील खड्डे तातडीने दोन दिवसात बुजवण्याचे निर्देश एनएचएआयला मुख्यमंत्र्यांनी दिले. या मार्गावरील अवजड वाहतूक काही काळासाठी बंद करावी, इतर अनुषंगिक उपाय योजावेत. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी नियमितपणे या वाहतूक कोंडीवर लक्ष ठेवावे, असे निर्देश मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

नाशिक, ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली परिसरातील रस्त्यांवरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एमएमआरडीए, एमएसआरडीसी, ठाणे महापालिका, कल्याण डोंबिवली महापालिका व इतर संबंधित विभागांचा समावेश असलेले विशेष कृतीदल स्थापन करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला.

शनिवारी सकाळी अकरा वाजता या कृतीदलाची पहिली बैठक आयोजित करण्यात आली असून त्या बैठकीत वाहतूक कोंडी सोडवण्याबाबत अधिक तपशीलवार उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती या बैठकीला उपस्थित असलेले आ. सत्यजित तांबे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com